प्रा. जयंत महाजन
सरकार कुणाचेही येवो, एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, संविधानाशी छेडछाड करण्याची आता कुणाची हिंमत होणार नाही. आता खुर्चीवर कुणीही बसो, खुर्चीला प्रश्न विचारण्याची हिंमत या देशामध्ये पुन्हा प्राप्त होईल. माध्यमांनाही आता कंठ फुटेल. न्यायव्यवस्थेचे डोळेही अधिक चांगल्याप्रकारे पाहू शकतील. प्रशासनही थोडे प्रामाणिकपणे काम करायला सुरू करेल. हा या देशातील पक्षांचा नव्हे, तर जनतेचा विजय अधिक आहे.
‘मी पुन्हा आलो आणि दोन पक्ष फोडून आलो’, असे गर्विष्ठ उद्गार काही दिवसांपूर्वी काढणार्या भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीस यांना चक्क राजीनामा देण्याची वेळ आली, इतकी दयनीय अवस्था त्यांनी स्वतःच्या पक्षाची करून टाकली. ‘मी पुन्हा येईन’ पासूनचा प्रवास ‘मला मोकळे करा’ इथपर्यंत येऊन पोहचलाय, हेच तर फडणविसांचे अपयश ठरले. भाजपने महाराष्ट्रात ठाकरेंचे १३ खासदार फोडले. महाराष्ट्राच्या जनतेने भाजपचे १४ खासदार पाडले. हा महाराष्ट्र आहे; इथे कर्माचा हिशोब व्याजासकट केला जातो. आपल्या हातूनच स्वतःचा पक्ष महाराष्ट्रात संपवून टाकण्याचे पातक आपल्या माथी बसण्यापूर्वीच ‘मी पक्षाची अधिक सेवा करणार असल्याने मला सरकारमधून मुक्त करावे’, अशी ‘ढोंगी’ भूमिका त्यांना घ्यावी लागली. अर्थात ही सर्व भूमिका अजूनही नाटकी पद्धतीनेच आहे, याची महाराष्ट्राला जाणीवदेखील आहे. आता त्यांनी राजीनामा देऊ नये, यासाठी त्यांचे पक्षातील ‘पंटर’ चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापासून गिरीश महाजन यांच्यापर्यंत सर्वजण कामाला लागतील यात शंका नाही; परंतु या ‘पंटरां’ची कुवतदेखील दयनीय झाली आहे. ‘संकटमोचक’ म्हणता म्हणता ज्या ज्या ठिकाणी त्यांनी हात घातला, तेथील अनेक उमेदवार पडले व ‘संकटमोचक’च संकटात सापडले. त्यामुळे त्यांनाही नाटकं करावीच लागणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी यादी द्यावी व केंद्राने महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांना सळो की पळो करून सोडावे, असा कार्यक्रम गेल्या अडीच वर्षांपासून सर्रास सुरू होता. तपास यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, माध्यमांची फौज, आयटीसेल, अफाट पैसा, मोडून पडलेल्या कणाहीन स्वायत्त यंत्रणा ईडी, सीबीआयच्या धाकाने मारून मुटकून आणलेले नेते, एवढे सगळे असताना मागच्या वेळेला मिळालेल्या देशातील तीनशे जागांवरून ७०-८० जागा खाली यायला लागलेले आहे. त्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आला. आयात केलेले नेते काढून टाकले आणि नि:पक्ष निवडणूक प्रक्रिया असेल, तर शंभरी गाठायलाही भाजपची आता दमछाक होईल.
अयोध्येमध्ये भाजपचा उमेदवार पडल्याची देशभर चर्चा सुरू आहे. ज्या राममंदिरावर राजकारण केले, त्याच मतदारसंघात भाजपचा उमेदवार पडला, कारण अतिशय गर्विष्ठपणे संविधान बदलण्याची भाषा त्या उमेदवाराने केली होती. सरकार कुणाचेही येवो, एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, संविधानाशी छेडछाड करण्याची आता कुणाची हिंमत होणार नाही. आता खुर्चीवर कुणीही बसो, खुर्चीला प्रश्न विचारण्याची हिंमत या देशामध्ये पुन्हा प्राप्त होईल. माध्यमांनाही आता कंठ फुटेल. न्यायव्यवस्थेचे डोळेही अधिक चांगल्याप्रकारे पाहू शकतील. प्रशासनही थोडे प्रामाणिकपणे काम करायला सुरू करेल. हा या देशातील पक्षांचा नव्हे, तर जनतेचा विजय अधिक आहे. मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा सत्ताधारी पक्षांच्या विरोधात जबरदस्त रोष दिसला. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाने परभणी, बीड, जालना, नांदेड मतदारसंघात कहर केला. बीड व परभणी लोकसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा, असे ध्रुवीकरण झाले. मराठवाड्यात जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशीव मतदारसंघांत ‘जरांगे फॅक्टर’ प्रभावी ठरला. त्यामुळेच २५ वर्षांची दानवेंची जिल्ह्यातील सत्ता जनतेने उलथवून लावली. दुसरीकडे नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण आणि हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकर यांनी विरोधी उमेदवारांना आस्मान दाखवले. त्यांच्या विजयात मराठा आंदोलनाचा अर्थात जरांगेंचा मोठा वाटा राहिला. सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले तरी त्यांना रोखता येते, सामान्य जनतेची ताकद काय असते ती देशाने दाखवून दिली आहे, कारण मोदींच्या सभा जेथे झाल्या, तेथे भाजपचा पराभव झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचा सुफडा साफ झाला.
स्वत: प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघात तिसर्या स्थानावर घसरले. काही दिवसांनी आंबेडकरांची वंचित आघाडी व राज ठाकरेंची मनसे यांचा सुपडा साफ होईल असेच चित्र दिसते. भाजपचे राज्यात पूर्वी २५ खासदार होते. आता २८ जागा लढवणार्या भाजपच्या वाट्याला राज्यात अवघ्या १० जागा आल्या आहेत. त्यातच सुधीर मुनगंटीवार, नवनीत राणा, भारती पवार, कपिल पाटील, रामदास तडस, उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसने तब्बल १३ जागा जिंकत महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. यापूर्वी केवळ एक खासदारकीची जागा असतानाही १७ जागा लढवत काँग्रेसला राज्यात १३ जागा जिंकता आल्या. त्या मागोमाग २१ जागा लढवणार्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पाच खासदार असतानाही ९ जागा जिंकल्या आहेत, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह आठ जागा जिंकण्यात यश मिळविले आहे. यंदाच्या निवडणूक निकालात प्रादेशिक पक्षांची कामग्िारी उत्कृष्ट राहिली आहे. देशपातळीवर ‘एनडीए’ सोबतच ‘इंडिया’ आघाडीतील प्रादेशिक पक्षांनीही चांगली कामगिरी केली आहे. ‘टीडीपी’ आणि ‘जेडीयू’ हे ‘एनडीए’मधील सर्वात महत्त्वाचे मित्रपक्ष म्हणून पुढे आले आहेत. त्याचबरोबर ‘जेडीयू’ने बिहारमध्ये भाजपपेक्षा कमी जागा लढवूनही जास्त जागा जिंकल्या आहेत. आता पंतप्रधान मोदींना पहिल्यांदाच ‘खिचडी’ सरकार चालवावे लागणार आहे. कधीही मित्र पक्षांना न जुमाणणार्या भाजपला आता ‘मोदी सरकार’ ऐवजी ‘एनडीए’ सरकार असाच शब्दप्रयोग करावा लागणार आहे व त्याची झलक दिसलीदेखील. आता नेहमीप्रमाणे सोशल मीडियाचा खेळ सुरू झाला आहे. ‘कसाबला फासावर लटकवणारा वकील हारला आणि कसाबची वकिली करणारी टोळी जिंकली’, असे संदेश सुरू झाले आहेत. जणू काही उज्ज्वल निकम देशाची फुकट सेवा करीत होते. अशा गोष्टींना तर मतदार कंटाळले आहेत; पण भाजपच्या नेत्यांना सांगणार तरी कोण?
९४२०६९१४२०