आपले जे स्वप्न होते, इच्छा होत्या त्या अपूर्ण राहिलेल्या आकांक्षांना मुलांनी पूर्णत्वास आणावे यासाठीचे सुप्त नियोजन व त्या अनुषंगाने येणारी कडक शिस्त म्हणजे पालकत्व नव्हेच. पालकत्व म्हणजे जे जे मुलांनी करावे, असे पालकांना वाटते ते पालकांनी विवेकाच्या पातळीवर तपासून आधी स्वतः नियमितपणे करणे.
सुजाण पालक होणे म्हणजे जगावेगळे काही तरी अशक्य, खूप कठीण असे काही करणे नव्हे; तर सजगपणे स्वतःच्या वर्तनाकडे, निर्णयाकडे आणि प्रतिक्रियांकडे लक्ष ठेवणे व चुका सुधारत स्वतःमध्ये चांगला बदल घडविण्यासाठी निरंतर प्रयत्न करीत राहणे होय! परंतु आदर्श पालकत्व म्हणजे मुलांना वळण लावणे, त्यांच्यावर संस्कार करणे, उपदेश करणे, वेगवेगळ्या गोष्टींसाठी आग्रह करणे असाच अर्थ बहुधा घेतला जातो. सुजाण पालकत्वाची आणखी सोपी व्याख्या करता येईल ती म्हणजे पालकांनी स्वतः एक चांगला नागरिक होणे, एक चांगला माणूस होणे! यापलीकडे वेगळे पालकत्व नाही. आपले जे स्वप्न होते, इच्छा होत्या त्या अपूर्ण राहिलेल्या आकांक्षांना मुलांनी पूर्णत्वास आणावे यासाठीचे सुप्त नियोजन व त्या अनुषंगाने येणारी कडक शिस्त म्हणजे पालकत्व नव्हेच. पालकत्व म्हणजे जे जे मुलांनी करावे, असे पालकांना वाटते ते पालकांनी विवेकाच्या पातळीवर तपासून आधी स्वतः नियमितपणे करणे; परंतु क्वचितच असे घडते. पालकांना वाटते मुले प्रामाणिक असावीत, हुशार असावीत, सोबतच नम्र असावीत, योग्य असा आहार घ्यावा, जे करावे ते आनंदाने करावे, अध्ययन करावे, वेळ पाळावी, त्यांच्यामध्ये सेवा भाव असावा, नियमांचे पालन व्हावे, इतरांचा आदर करावा, दुसर्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, योग्य विचार करावा, नेहमी त्याच त्या चुका होऊ नये, त्यांनी जे ठरविले ते पूर्णत्वास न्यावे इत्यादी इत्यादी.. शेवटी काय तर कर्तृत्वाने मुलांनी आपले नाव उजळ करावे.
गंमत ही आहे, की हेच मुद्दे किंवा या अपेक्षा पालकांसाठीही लागू होतात; परंतु प्रत्यक्षात या सर्व गोष्टींचे पालन करणे सहज शक्य होत नाही. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपण बर्यापैकी आहोत आपल्या पालकांसारखे.. त्यांच्या सवयी, त्यांची विचार करण्याची पद्धत, प्रतिक्रिया, भीती, असुरक्षितता, इतरांविषयीच्या भावना, त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धती वगैरे (ही यादी फार मोठी करता येईल) बर्यापैकी आपल्या व्यक्तिमत्त्वात रूजल्या आहेत. याचे कारण म्हणजे मुलांची जडणघडण ही पालकांच्या उपदेशाप्रमाणे किंवा त्यांच्या विचारांप्रमाणे होत नाही, तर पालकांच्या वर्तनातून प्रामुख्याने होते. त्यामुळे आपण मुलांना काय सांगतो यापेक्षा आपण प्रत्यक्षात कसे वागतो यातूनच मुले घडतात.शब्दांनी संस्कार होत नाही, वागण्याने होतो. अलिप्त राहून जर आपण विचार केला, तर असे लक्षात येईल की आपल्या पालकांनी आपल्याला केलेले उपदेश आपल्या वर्तनात सहसा आढळत नाहीत; पण तेच उपदेश इतक्या वर्षांनंतरही आपल्या लेकरांना आपण करत असतो; परंतु आपल्या पालकांच्या वर्तनातील चांगल्या- वाईट गोष्टी (त्या योग्य असोत अथवा नाही) मात्र आपल्या आयुष्याचा भाग झालेल्या आहेत. एक श्रीमंत पालक समुपदेशनासाठी आपल्या विशीतल्या मुलाला घेऊन आमच्याकडे आले. अनेक विषयांसोबतच मुलाच्या कार चालविण्याबाबतची तक्रार त्यांनी माझ्याजवळ व्यक्त केली. ‘ह्याच्या भरधाव वेगाने गाडी चालविण्याची मला फार काळजी वाटते हो!’ अत्यंत कळकळीने त्यांनी मुलासमोरच मला सांगितले. ‘वारंवार सूचना करूनही फरक पडत नाही.
ऐकल्यासारखे करतो पण ‘सिग्नल्स’ पाळत नाही. केव्हाही गाडी ‘ओव्हरटेक’ करतो.’ त्यावर मुलगा लगेच उत्तरला, ‘पप्पा, तुमच्यापेक्षा मी छान चालवतो!’ मला बाप-लेकाच्या संवादात उत्सुकता वाटली म्हणून मी विचारले, ‘म्हणजे?’ त्यावर तो उत्तरला, ‘सर, पप्पाना खूप ‘रफ’ गाडी चालवतात. ते स्वतः तरी कुठे वाहतुकीचे नियम पाळतात?’ पुढे एकांतात वडिलांचे समुपदेश झाल्यावर त्यांना त्यांची चूक लक्षात आलेली होती. त्यांनी चूक कबूल केली. म्हणाले ‘माझ्या गाडी चालविण्याचा संस्कार नकळत माझ्या मुलावर झालेला आहे.’ वडील एक जागरूक नागरिक नसेल, तर ते आदर्श पालक होऊ शकत नाही. पालकत्व हा दाखविण्याचा किंवा सांगण्याचा विषय नाही, तो नेहमीच केवळ आणि केवळ वर्तनाचा विषय आहे. मुलांसाठी अत्यंत चांगली असणारी आई एक चांगली व्यक्ती नसेल, तर ती चांगली सासू होऊ शकत नाही. आई-वडिलांसाठी अत्यंत आज्ञाधारक असलेला मुलगा एक चांगला माणूस नसेल, तर चांगला नवरा होईलच असे नाही, अत्यंत चांगला व बायकोची काळजी घेणारा नवरा हा म्हातार्या आई-बाबांसाठी एक चांगला मुलगा असेलच असे नाही; परंतु एक चांगला माणूस हा नेहमीच चांगला मुलगा, चांगला पालक, चांगला शेजारी असू शकतो. आपल्या समाजाला आता गरज आहे अशा चांगल्या माणसांची.. चांगल्या नागरिकांची! चांगले पालक असल्याशिवाय असा समाज निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे उपदेशातून नव्हे, तर स्वतःच्या चांगल्या वर्तनातून मुलांची जडणघडण करून.. देश घडवू या!
मनोज गोविंदवार
८८३०४७८७३५
manojgovindwar@gmail.com
पालक समुपदेशक, जळगाव