दोनेक महिन्यांपूर्वी निवडणुकोत्सवाला सुरुवात झाली. २०२४ सालच्या निवडणुकीचा निकाल लागल्यात जमा आहे, अशी तेव्हा ‘हवा’ होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे भाजपला हमखास जिंकून देणारे ‘हुकमी एक्का’. अजेंडा प्रस्थापित करणे, आपले म्हणणे सफाईदारपणे लोकांच्या गळी उतरवणे, आणि हा-हा म्हणता देशाचा मूड आपल्या बाजूला वळवून घेणे, हे त्यांचे हातखंडा काम. त्यांना त्यांचे हे हातखंडा काम नीट पार पाडता यावे, म्हणूनच निवडणूक आयोगाने निवडणुकीचे हे असे लांबलचक वेळापत्रक आखले आहे, असे बोलले जाऊ लागले. २०१४ पासून एखाद्या व्यक्तीमध्ये ‘करिष्मा’ ऊर्फ जादू अशी आहे, की ती व्यक्ती प्रचारसभांमध्ये जे बोलते, तसेच घडते, आणि अनेकदा झालेही तसेच. ‘अब की बार मोदी सरकार’, ‘अब की बार, तीनसो पार..!’, तसेच गेल्या दहा वर्षांत झालेल्या प्रत्येक निवडणुकीचे ‘ओपिनियन पोल’सुद्धा मोदींच्याच बाजूने आणि निकाल लागल्यानंतर ते जवळपास खरेही ठरलेले सबंध देशाने पाहिले आहेत. व्यक्तिमत्त्वातला करिष्मा ऊर्फ जादू कुणातही असू शकते. एखादा संत वा धार्मिक व्यक्ती असेल, एखादी चित्रपटतारका असेल, एखादी गायिका असेल, एखादा खेळाडू असेल वा एखादा राजकारणीही असेल.
मोदींमध्ये तो निश्चितच आहे. अर्थात, मोदींच्या भक्तांचा पंथ अजूनही अस्तित्वात आहे, हे नाकारता येणार नाही. राजावर निर्विवाद निष्ठा असलेल्या श्रद्धाळू लोकांचा जथ्था म्हणजे हा ‘भक्तपंथ’. भक्तांच्या मते सरकारकडून कुठलीही चूक होणे शक्यच नाही आणि यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे बेकायदेशीर ठरवलेल्या ‘निवडणूक रोखे’ योजनेच्या बचावाला धावून येणे, ही सरकारची एक चूक. त्यामुळे त्यांची प्रतिमा एकाएकी ‘न्यायव्यवस्थेला धूप न घालणारा पंतप्रधान’, अशी होऊन बसली. कधी नव्हे, ती ‘चंदा दो, धंदा लो’ ही काँग्रेसने दिलेली घोषणा अचूक शरसंधान करून केली. हे पुरेसे नव्हते म्हणून की काय, अरविंद केजरीवाल यांना अटक करून मोदींनी स्वतःच्या अडचणींमध्ये भरच घातली. ही अटक निव्वळ सूडभावनेने केली जात असल्याचे चित्र तयार झाले. पंजाब, हरियाणा आणि दिल्ली या तीनही राज्यांत भाजपाच्या विरोधात वातावरण गेले आहे. पक्षात आलेल्या इतरांच्या बाबतीत आणि पक्षात न आलेल्यांच्या बाबतीत वेगवेगळा न्याय, यावरून ‘वॉशिंग मशीन’ ही भाजपला काँग्रेसने उपरोधाने बहाल केलेली उपाधी अनेकांना चपखल वाटू लागली.
दुसर्या बाजूला ‘२०२४ची निवडणूक आम्ही जिंकल्यात जमा आहे’ या मोदींच्या प्रचाराला विरोधी पक्ष जुमानेनासा झाला. उलट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भाजपचे प्रतिस्पर्धी मोदींनी दिलेल्या आणि न पाळलेल्या वचनांबद्दल मोदींना जाब विचारू लागले. त्यांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीची कसून चिकित्सा होऊ लागली. भाजपाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात म्हटले आहे की, डाळ, खाद्यतेल आणि भाज्या यांच्या उत्पादनात भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवून ‘गरीब की थाली को सुरक्षित’ करण्याचा प्रयत्न केला जाईल. डाळ आणि भाज्या, हे पदार्थ खनिज तेलासारखे पृथ्वीच्या पोटात तयार होतात की, समुद्राच्या? ती जर शेती पिके असतील, तर मग महाराष्ट्र ते पंजाब-हरयाणा, व्हाया गुजरातपर्यंतचे शेतकरी गेल्या दहा वर्षांत सातत्याने हमीभावासाठी, आरक्षणासाठी, आपल्या मागण्यांसाठी रस्त्यांवर का उतरत आहेत? त्यांच्या शेतात डाळी आणि भाज्या पिकवल्या जात नाहीत का? इ. प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.
दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचा दावा मोदींनी आपल्या पहिल्या कार्यकाळातच केला होता; पण प्रत्यक्षात दरवर्षी एक कोटीसुद्धा रोजगार उपलब्ध करून दिलेला नाही. त्यात नोटबंदी आणि कोरोनाकाळ यांमुळे बेरोजगारांच्या संख्येत अजूनच भर पडली आहे. या सगळ्यांवरून जनमानसामधला असंतोष, खदखद, आणि संताप या सार्याला सत्ताधारी पक्षाच्या विरोधात वाचा फुटली आहे. ‘जिंकल्यात जमा’ प्रकारची भाकिते करणारे रणनीतिज्ञ तूर्तास जात्यधारित समीकरणांची जुनीच जुळवणी करण्यात मग्न आहेत, तसेच पुन्हा एकदा त्याच त्या शिळ्या ‘हिंदू-मुस्लीम’ कढीला ऊत आणण्यापुरते उरले आहेत. देहाने दमले-भागलेले तर ते आहेतच; पण त्यांचा राजकीय संदेशही प्रभावहीन भासतो आहे.