पाचवा टप्पा असली- नकली शिवसेनेवर शिक्कामोर्तब करेल. या टप्प्यात भाजप, सेना, उबाठाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशीच स्थिती देशभर आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस, अमेठी, रायबरेलीसह काही जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे. तिथेही दलित-मुस्लीम साथ मिळत आहे. भाजपच्या एका नार्याने निवडणूक लढतींचे चित्र बदलले.
मुंबई, विदर्भ कोणाचा गड..!
लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीचा पाचवा टप्पा संपला. कुठेही लाट नाही. प्रभावी नेता नाही. नेत्यांचा प्रभाव नाही. भाजपने घाईघाईत राम मंदिराचे उद्घाटन (Ram Temple) केलं. अन् निवडणूक जिंकल्याचा आव आणला. प्रत्येक मतदारसंघातून हजार- पाच हजारांना अयोद्धा यात्रा घडविली. फेब्रुवारी- मार्च (February- March ) महिना त्यात घालविला. विशेष रेल्वे गाड्या सोडल्या. त्या जोरावर ‘अबकी बार चारसो पार’चा नारा दिला. हा नारा भाजपवर उलटला. त्यानं राम मंदिर मुद्दा संपवला. अतिउत्साह अन् अतिआत्मविश्वास नडला. भाजपचे काही नेते बडबडले. त्यात फैजाबादचे भाजपचे उमेदवार (BJP candidate ) लल्लूसिंग यांचाही समावेश होता. या मतदारसंघात अयोद्धा येते. संविधान बदलण्यास चारशे पार हवे, असे ते म्हणाले. लगेच ते बदलले. असं म्हणालो नाही, असा खुलासा केला. शब्दबाण सुटला. त्यानं घात केला. हाच निवडणुकीचा टर्निग पाईंट ठरला. एकतर्फी वाटणारी निवडणूक लढतीत बदलली. तिने भाजपची दमछाक केली.
एप्रिल उजाडला. हा मुद्दा आणखी तापला. जाती, जमातींमध्ये वार्यासारखा घुसला. निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू झाला. पहिल्या दोन टप्प्यांत विदर्भ (Vidarbha) होता. विदर्भ जाती, जमाती, ओबीसींचा गड. भाजपच्या खासगीकरणामुळे अगोदरच तो दुखावलेला. भाजपवर नाराज. संविधान बदलणार, आरक्षण संपणार, या अफवांनी जोर धरला. जाती, जमाती कोपल्या. त्यांना कुणबी- मुस्लीम यांची साथ मिळाली. कमजोर वाटणारी काँग्रेस शक्तीशाली बनली. आघाडी तगड्या झुंजीत आली. याचा महाराष्ट्रात (Maharashtra) दुहेरी फटका वंचित-बसपाला (Vanchit-BSP) बसला. सोलापूर, बारामती, जळगाव अशा अनेक मतदारसंघांतील वंचित उमेदवारांनी माघार घेतली. काहींनी मतांची फाटाफूट नको, या भावनेतून लढण्यास नकार दिला. वेळेवर काही ठिकाणी दुसर्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली.. त्यात मनसेतून आलेले वसंत मोरे सारखे अनेक आहेत. ज्यांना वैचारिकतेशी काही घेणे-देणे नाही. केवळ निवडणुकीशी घेणे-देणे असते. हवा कशी वाहते आहे, हे भाजपच्या लक्षात आले. तोपर्यंत बराच उशीर झाला होता. हे चित्र केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभर आहे. अनुसूचित जाती जागल्या. त्यांनी इंडिया आघाडीला साथ दिली. उत्तर प्रदेशात बसपालाही मोठा तडाखा बसल्याची चर्चा आहे. संविधान बदलाची चर्चा देशभर पसरली.
संविधान बदलणार नाही, असा खुलासा करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, ( Narendra Modi ) अमित शहा (Amit Shah ) व अन्य भाजपच्या नेत्यांना फिरावे लागले, तर राहुल गांधी, तेजस्वी यादव, अखिलेश यादव व इंडिया आघाडीचे (India Alliance) नेते भाजप संविधान बदलणार, असे सांगत सुटले. मतदानाच्या पाच टप्प्यांत हेच चित्र दिसले. एकूणच राम मंदिर, ३७० कलम, पाकिस्तान हे मुद्दे प्रभावहीन झाले. राहुल गांधी यांनी सामाजिक न्यायाचे मुद्दे मांडले. जनगणना करू अन् सत्ता व संपत्तीत वंचिताना वाटा, महिलांना दरमहा मदत, शेतकर्यांच्या उत्पादनाला भाव, कर्जमाफीची घोषणा, त्या पद्धतीने बनवलेला पक्षाचा जाहीरनामा जनमानसांत पोहचला. महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांचा अंडर करंट दिसला. लोकसभा निवडणुकांचे सात टप्पे आहेत; मात्र महाराष्ट्रातील निवडणुकीचा मतदानाचा पाचवा शेवटचा टप्पा होता. तो २० मे रोजी आटोपला. साधारणपणे संवेदनशील भागात निवडणूक टप्पे वाढवितात. उत्तर प्रदेश अधिक संवेदनशील. तिथे दोन टप्प्यांत मतदान अन् शांत महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान. हे अजिबात पटणारे नाही. यावरून निवडणूक आयुक्त सांगकाम्या दिसतो. हा संशय बळावतो. पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह महाराष्ट्रातील १३ जागांचा समावेश होता. या टप्प्यात भाजपचे चार केंद्रीय मंत्री रिंगणात होते. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे होते. एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्यात ठाणे व कल्याणच्या जागेवरून आपसात समझोता झाल्याची चर्चा आहे. ठाण्यात राजन विचारे यांच्या विरोधात शिंदे गटाने नरेश मस्के यांना मैदानात उतरविले, तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना मैदानात उतरविले. अशाप्रकारे दोघांनी आपआपल्या खास उमेदवाराची विजयाची खात्री करून घेतल्याची चर्चा आहे. यामुळे राजन विचारे आणि श्रीकांत शिंदे यांचा विजय समजला जातो.
मुंबईत लोकसभेच्या सहा जागा आहेत. यापैकी चार जागा ठाकरे गट लढवित आहे, तर दोन जागांवर काँग्रेस उमेदवार लढत आहेत. मुंबई उत्तरमध्ये भाजप उमेदवार पियूष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसने भूषण पाटील यांना मैदानात उतरविले. प्रारंभी एकतर्फी वाटणारी ही लढत जातीय समीकरणांमुळे काट्याची बनली. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात ऐनवेळी भाजपने उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरविले; मात्र त्यांची भट्टी जमली नसल्याची चर्चा आहे. मुंबईत भाजपला केवळ एका जागेची आशा आहे. शिवसेना- शिंदे गटाला मुंबई दक्षिण- मध्य लोकसभा मतदारसंघात राहुल शेवाळे या जागेची आशा आहे. उर्वरित चार जागा इंडिया आघाडीकडे जातील, असा कल आहे. मुंबई कोणाची याचा फैसला चार जूनला कळेल. भाजपने जोखीम नको म्हणून शेवटच्या घटकेला मनसेचे राज ठाकरे यांना नरेंद्र मोदी यांच्या सभा मंचावर आणले. एकूणच कठीण वाटणारे तेरा मतदारसंघ भाजपने पाचव्या टप्प्यात ठेवले होते. नाशिक आणि दिंडोरी या दोन मतदारसंघांत कांदा मुद्दा होता. त्याची झळ हेमंत गोडसे व भारती पवार यांना बसेल का..! भिवंडीत भाजपचे कपिल पाटील विरुद्ध राकाँचे सुरेश म्हात्रे, असा सामना रंगला. धुळ्यात भाजपचे सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्छाव लढत झाली. पालघरात भाजपचे हेमंत सावरा विरुद्ध ठाकरे गटाच्या भारती कामडी अशी झुंज होती. एकूणच पाचवा टप्पा असली- नकली शिवसेनेवर शिक्कामोर्तब करेल. या टप्प्यात भाजप, सेना, उबाठाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशीच स्थिती देशभर आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस, अमेठी, रायबरेलीसह काही जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे. तिथेही दलित-मुस्लीम साथ मिळत आहे. भाजपच्या एका नार्याने निवडणूक लढतींचे चित्र बदलले. त्याचा किती फायदा- तोटा कोणाला मिळेल, त्यावर सत्तेचे गणित ठरेल.
भूपेंद्र गणवीर
ज्येष्ठ पत्रकार, नागपूर
९८३४२४५७६८