पातुर (Akola):- पातुर तालुक्यातील पातुर ते आगिखेडमार्गे धाबा या सुमारे सहा ते सात किलोमीटरच्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. जागोजागी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे या मार्गावरून ये-जा करणे अत्यंत जिकिरीचे आणि धोकादायक बनले आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, यामुळे अपघाताची (accident) शक्यता वाढली आहे.
या मार्गावरून ये-जा करणे अत्यंत जिकिरीचे आणि धोकादायक
या खराब रस्त्याचा सर्वाधिक त्रास शाळकरी विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे जीव मुठीत धरून त्यांना शाळेत जावे लागते. तसेच, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आग लागल्यासारखी कोणतीही दुर्घटना घडल्यास, खराब रस्त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाची वाहने वेळेत गावात पोहोचू शकणार नाहीत. आजमितीस गंभीर आजारी रुग्णांना तातडीने उपचारासाठी कसे पोहोचवावे, हा मोठा यक्षप्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णांच्या जीवावर बेतू शकते आणि याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक विचारत आहेत. या गंभीर समस्येबाबत वृत्तपत्रांमध्ये (News Paper) वारंवार बातम्या प्रसिद्ध झाल्या, मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.
खामखेडच्या सरपंच नंदाताई विठ्ठल काळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की, “या रस्त्याने प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे आणि मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबंधित विभागाने आणि प्रशासनाने तातडीने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन रस्त्याचे काम मार्गी लावावे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आगिखेड, खामखेड आणि पार्डी या रस्त्यालगतच्या गावातील नागरिकांनी आता लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन रस्त्याच्या दुरुस्तीसाठी त्वरित पाऊले उचलावी, अशी आर्त विनंती केली आहे.