बोरी/लगाम (Gadchiroli) :- गावठी कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात चितळाचा मृत्यू झाल्याची घटना काल २४ मे रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील बोरी /लगाम येथे घडली.
गावकरी व घरमालकाने त्या चितळाची गावठी कुत्र्याकडून सुटका केली
जंगलातील चितळस गावठी कुत्र्यांनी त्याचा पाठलाग करून जखमी केले. यामुळे जखमी अवस्थेतील चितळाने आपला जीव वाचवण्यासाठी गावाच्या दिशेने धाव घेतली व प्रदिप निकोडे यांच्या सांदवाळीत शिरला. गावकरी व घरमालकाने त्या चितळाची गावठी कुत्र्याकडून सुटका केली. पण कुत्र्यांच्या चाव्यामुळे चितळ गंभीर जखमी झाला होता. गावात चितळ आल्याची बाब हवेसारखी पसरली असता गावातील अनेक नागरिकांनी चितळाला बघण्यास एकच गर्दी केली. वन विभाग आणि पशुवैद्यकीय विभाग यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. पण पशुवैद्यकीय अधिकारी वेळेवर न पोहोचल्याने त्या चितळावर वेळेवर उपचार झाला नाही आणि काही क्षणातच चितळाला आपला जीव गमवावा लागला. काही वेळानंतर वनविभागाची (Forest Department) टीम दाखल झाली. वनपरिक्षेत्र अधिकारी मद्देलवार, वनरक्षक लेखामी, वनमजूर शंकर रामगिरीकर व सडमेक हे यावेळी उपस्थित होते. वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल गुरनुले यांच्या समक्ष पंचनामा करून चितळावर अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले. यावेळी संजय मोहुर्ले , महेश बाकीवार ,विस्तारी गंगाधरीवार, ज्ञानेश्वर पुलीवार ,महेश गंगाधरवार श्रीनिवास अवनुरवार आणि गावातील असंख्य महिला भगिनी यावेळी उपस्थित होत्या.




