लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान आता शिल्लक राहिले आहे. पुढच्या आठवड्यात ‘दिल्ली’ कुणाची याचा फैसला होणार आहे. पंजाब, बिहार, उत्तर प्रदेशसारख्या राज्यातील महत्त्वाच्या जागांवर या शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. शनिवारी हे मतदान पार पडल्यानंतर मंगळवारी मतमोजणी होऊन दिल्लीत कोणाचे सरकार स्थापन होणार हे चित्र स्पष्ट होईल. यावेळी या निवडणुकीत कोणतीही अशी लहर दिसून आली नाही. केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात असंतोष नक्कीच होता; परंतु त्या असंतोषाने विस्फोटक स्वरूप धारण केल्याचे दिसले नाही. अर्थात या असंतोषाचा फायदा विरोधी पक्षांना नक्कीच होईल; परंतु तो फायदा सत्तांतर घडविण्याइतपत मोठा असेल की नाही याबाबत निवडणूक तज्ज्ञ शंका व्यक्त करीत आहे. निवडणूक निकालाच्या संदर्भात शास्त्रीय अभ्यास करून भाकीत वर्तविण्याच्या बाबतीत ज्या काही बोटावर मोजण्याइतपत अभ्यासकांचा उल्लेख केला जातो त्यामध्ये योगेंद्र यादव आणि प्रशांत किशोर या दोघांचा नक्कीच समावेश आहे. या दोघांनीही आपापल्या परीने जनतेचा मूड लक्षात घेऊन आणि इतर काही कसोट्यांचा आधार घेत या लोकसभा निवडणुकीत कोणत्या आघाडीची स्थिती कशी असेल यासंदर्भात आपला अंदाज व्यक्त केला आहे. प्रशांत किशोर यांच्या मते देशात मोदी सरकारच्या विरोधात वातावरण नक्कीच होते; परंतु काँग्रेस नेतृत्वाला ही नाराजी आपल्या बाजूने केंद्रीत करण्यात फारसे यश मिळालेले दिसत नाही. त्यामुळे या निवडणुकीत मागच्या तुलनेत भाजपच्या जागांमध्ये फारशी घट येणार नाही.
कदाचित भाजपच्या जागांमध्ये वाढदेखील होऊ शकते. साधारण २९५ ते ३१५ या दरम्यान भाजपला जागा मिळतील. मागच्या वेळी भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या. याचा अर्थ याही वेळेस केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप आघाडीचे सरकार स्थापन होईल. अन्य एक अभ्यासक योगेंद्र यादव यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष मात्र थोडे वेगळे आहेत. योगेंद्र यादव यांनी जवळपास प्रत्येक राज्याचा तुलनात्मक अभ्यास करून कोणत्या आघाडीला किती जागा मिळू शकतात किंवा कोणत्या आघाडीला कोणत्या राज्यात किती नुकसान होऊ शकते याची मांडणी केली आहे. सहाव्या टप्प्यातील मतदानानंतर योगेंद्र यादव यांनी आपला अंदाज वर्तविताना काँग्रेसला ५० ते १०० जागा मिळण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. त्यासोबत काँग्रेस वगळता इंडिया आघाडीला १२० ते १३५ जागा मिळू शकतात, असा त्यांचा अंदाज आहे. निवडणुकीआधी चारसो पारचा नारा देणार्या भाजपला कशीबशी सत्ता राखता येईल किंवा कदाचित तेदेखील शक्य होणार नाही असे योगेंद्र यादव यांना वाटते. भाजप आघाडीला ३०० जागाही मिळणे कठीण झाल्याचे निरीक्षण योगेंद्र यादव नोंदवत आहेत. सहाव्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपा २५० पेक्षाही कमी जागा जिंकेल असे योगेंद्र यादव यांना वाटते. एकूण देशाचे चित्र पाहिले तर भाजपाला देशात २४० ते २६० जागा मिळू शकतात तर भाजप सोबत असलेल्या मित्र पक्षांना ३५ ते ४५ जागा मिळतील असा दावा योगेंद्र यादव यांनी केला आहे. अर्थात इंडिया आघाडीदेखील बहुमताच्या आकड्यापासून दूर राहील असे त्यांना वाटते. इंडिया आघाडीला अधिकतम २०५ ते २३५ जागा मिळू शकतात; परंतु सातव्या टप्प्यातील उत्तर प्रदेश, बिहारमध्ये काही मोठे फेरबदल होऊ शकतात. जर प्रत्यक्षात तसे झाले इंडिया आघाडी एनडीएच्या पुढे जाण्याची शक्यता ते नाकारत नाही.
आपण हा निष्कर्ष जमिनीवरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन काढला असल्याचे योगेंद्र यादव यांनी सांगितले. यादव यांच्या मते केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये भाजप आघाडीला चार जागांचा फायदा होऊ शकतो. आंध्र प्रदेशात भाजपा आघाडीला १५ जागा मिळू शकतात. तेलंगणात काँग्रेस आणि भाजपात लढत आहे. इथे काँग्रेस, भाजपा दोघांच्या जागा वाढतील. भाजपा याआधी ४ जागांवर जिंकली होती आता आणखी ४ जागांची वाढ होईल. ओडिशात भाजपाकडे ८ जागा होत्या, त्यात ४ जागा; परंतु दुसरीकडे एकट्या कर्नाटकात भाजपाला १२ जागांचे नुकसान होऊ शकते. पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या जागा वाढण्याची शक्यता नाही. पूर्वोत्तर भारतात मागील वेळच्या तुलनेत यंदा भाजपाची कामगिरी सुधारेल, मात्र महाराष्ट्रात भाजपा आघाडीला मोठा धक्का बसू शकतो. महाराष्ट्रात भाजप आघाडीला किमान २० जागांचे नुकसान सोसावे लागू शकते. राजस्थान, गुजरातमध्येही भाजपाला १० जागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड येथे भाजपाच्या १० जागांचे नुकसान होईल. हरियाणा, दिल्लीत भाजपाला १० जागांवर फटका बसेल. पंजाब, चंदिगड, हिमाचल, जम्मू-काश्मीर या राज्यातही भाजपाला ५ जागांचा फटका बसेल. उत्तर प्रदेश, उत्तराखंड येथे १० जागांचे नुकसान संभवते. बिहारमध्ये मागील निवडणुकीत ३९ जागा मिळाल्या होत्या, यंदा येथेही १० जागांवर नुकसान सोसावे लागेल. दोन्ही विश्लेषकांच्या मांडणीची सरासरी काढायची झाल्यास कदाचित भाजप आघाडीला निसटते बहुमत मिळू शकते. इंडिया आघाडीने यावेळी बराच जोर लावला खरा; परंतु ही आघाडी बहुमताच्या भोज्याला स्पर्श करण्याची शक्यता कमी आहे.