नुकसानीचे पंचनामे नियमांनुसार, प्रत्यक्ष शेतावर जाऊन तलाठी आणि कृषी सहाय्यकांनी केले!
पातूर (False Complaint) : टाकळी, खेट्री येथील काही शेतकऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध नुकत्याच दाखल झालेल्या खोट्या तक्रारी त्वरित रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी करत तहसीलदार पातुर यांच्याकडे अर्ज सादर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी काही शेतकऱ्यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबत खोट्या तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र, या गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी तहसीलदारांना (Tehsildar) दिलेल्या अर्जात स्पष्ट केले आहे की, या महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे नियमांनुसार, प्रत्यक्ष शेतावर जाऊन तलाठी आणि कृषी सहाय्यकांनी केले आहेत.
खोट्या तक्रारींमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास!
या तक्रारी गावातील वैयक्तिक व राजकीय मतभेदातून दाखल करण्यात आल्या असून, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पंचनाम्यांची यादी ग्रामपंचायतीमध्ये (Gram Panchayat) प्रसिद्ध करून पूर्णपणे पारदर्शक ठेवण्यात आली आहे. तरीदेखील या खोट्या तक्रारींमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास होत आहे, तसेच त्यांच्या कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे ही तक्रार तत्काळ रद्द करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे दिलेल्या अर्जात केली आहे.




