कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
शिरपूर(Shirpur):- शिरपूर पोलीस स्टेशन (Police Station) अंतर्गत येत असलेल्या ग्राम वाघी बु येथील तरून शेतकरी शंकर रामभाऊ वाघ (वय 43)यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या(suicide) केल्याची घटना 29 फेब्रुवारी रोजी सकाळच्या दरम्यान घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरून मर्ग करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम वाघी येथील तरुण शेतकरी शंकर रामभाऊ वाघ (वय 43) यांनी दिनांक 29 फेब्रुवारी रोजी कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळच्या दरम्यान घडली. त्यांच्याकडे चार एकर शेती जमीन आहे. तसेच एचडीएफसी बँकेचे पीककर्ज सुद्धा आहे. गतवर्षी त्यांच्या मुलीचा विवाह संपन्न झाला होता. त्याचेही खाजगी कर्ज त्यांच्या डोक्यावर होते.
यावर्षी सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. तुरीचे पीकही अवकाळी पावसाने गेले आहे. सोयाबीनच्या मालाल भाव नसल्याने शेतकरी वर्ग पुरता मेटाकोटीस आलेला आहे. आसमानी व सुलतानी संकटांनी शेतकरी वर्ग कर्जबाजारी होत आहे. त्या निराशेतून शेतकरी आत्महत्या करत आहेत. सदर शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढल्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (Inspector of Police) रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये शिरपूर पोलीस करीत आहेत.