निविष्ठा वितरण कार्यक्रम!
रिसोड (Farmer Training) : खरीप हंगाम 2025 करिता कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय (Ministry of Farmers Welfare), भारत सरकार अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अभियानाच्या (National Food Security Mission) तेलबिया उत्पादन वाढ उपक्रमाअंतर्गत, कृषी विज्ञान केंद्र, वाशिम यांच्या वतीने शेतकरी प्रशिक्षण व निविष्ठा वितरण कार्यक्रम दि. 16 जून 2025 रोजी सनराईज इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, नागरतास, ता. मालेगाव येथे आयोजित करण्यात आला.
शेतकऱ्यांनी विज्ञानाधारित तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादनक्षम शेती करावी!
या कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. आरिफ शहा, कृषी विज्ञान केंद्र, वाशिमचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे, शास्त्रज्ञ टी. एस. देशमुख, तालुका कृषी अधिकारी श्री. कैलास देवकर, तसेच सनराईज कॉलेजचे प्राचार्य श्री. सुर्वे सर आणि मॅडम रोज मेरी यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. आरिफ शहा यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, तेलबिया उत्पादन वाढीसाठी सुधारीत तंत्रज्ञान, दर्जेदार वाण आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन आवश्यक असून, कृषी विज्ञान केंद्र, वाशिम हे या दिशेने प्रभावी कार्य करत आहे. शेतकऱ्यांनी विज्ञानाधारित तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादनक्षम शेती करावी, असे त्यांनी आवाहन केले.
शेती पद्धतीचे फायदे आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन!
डॉ. आर. एल. काळे यांनी तेलबिया पिकांमधील उत्पादन वाढीसोबतच बियाणे उत्पादनाचे महत्त्व, माती परीक्षण, एकात्मिक शेती पद्धतीचे फायदे आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन (Guidance) केले. शास्त्रज्ञ टी. एस. देशमुख यांनी मानसूननंतर योग्य वेळी पेरणी, सरी-वरंबा पद्धत, बियाणे प्रक्रिया, अंतरपीक पद्धती, व तणनाशक वापर याविषयी तांत्रिक माहिती दिली.
योग्य पावसाची वाट पाहूनच पेरणी करण्याचे मार्गदर्शन!
तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर (Agriculture Officer Kailas Deokar) यांनी विविध शासकीय योजनांची माहिती देत, योग्य पावसाची वाट पाहूनच पेरणी करण्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University), अकोला निर्मित सोयाबीन वाण पीडीकेव्ही अंबा, तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ निर्मित फुले दुर्वा (KDS-992) ही उच्च दर्जाची वाणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली. यासोबत बियाणे प्रक्रियेसाठी आवश्यक निविष्ठाही देण्यात आल्या. कार्यक्रमात अमानी, करंजी, शेलगाव बगाडे, वाघळुड, पांगरी कुटे, एकांबा आदी गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवाजी वाघ, प्रविण जाधव व अक्षय गिरी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. एस. देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्षय गिरी यांनी मानले.




