खरीप हंगाम गेला; रब्बीत उत्पादनापेक्षा खर्चच जास्त
अस्मानी नंतर सुलतानी शेतकर्यांच्या जीवावर उठली
देशोन्नती
उमरखेड (Fertilizer Rates Rise) : अतिवृष्टीने खरीप पेरणीचा खर्चही निघालेला नसताना रब्बी हंगामात रासायनिक खतांच्या वाढत्या दराने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यात खताच्या लिंकिंगच्या मार्याने अडचणीत जास्तीची भर पडली आहे. (Fertilizer Rates Rise) उत्पादनापेक्षा लागवडीचा खर्चच जास्त होतो की काय, अशी भीती शेतकर्यांमधून व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात रब्बी हंगामात जवळपास ४० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल, असा अंदाज आहे. त्यानुसार कृषी विभागाकडून खत, बियाणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, गत हंगामात शेतकर्यांना चढ्या दराने (Fertilizer Rates Rise) रासायनिक खताची खरेदी करावी लागली होती. आता रब्बी हंगामातही २०० ते ६०० रुपयांपर्यंत खतांचे दर वाढले आहेत.
अगोदरच अतिवृष्टीने जवळपास एक ते दीड महिना उशिराने पेरणी होत आहे. काही शेतकर्यांना सोयाबीन विक्रीतून पेरणीचा खर्चही निघाला नाही. तर काहींचे सोयाबीन अजून हमीभावाच्या आशेने घरातच पडून आहे. ऐन पेरणीच्या वेळी खताचे दर गगणाला भिडल्याने शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे.




