तपास अधिकारी वेंजने यांनी जनसमुदायाला शांत राहण्याचे केले आवाहन
मानोरा (Washim):- यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस पोलीस ठाण्यात (Police Staion)दाखल झालेल्या जनसंघर्ष अर्बन निधी लि. च्या तब्बल ४७ कोटींच्या आर्थिक घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार प्रणित देवानंद मोरे यांच्यासह तीन संचालकांना अखेर पोलिसांनी मंगळवारला दि. १४ जानेवारीला पुणे – लोणावळा येथून अटक केली.
मुख्य सुत्रधार प्रणित मोरेसह तीन आरोपींना अटक
जनसंघर्ष अर्बन निधी ली. चे मुख्य सुत्रधार आरोपी प्रणित मोरे यांनी यवतमाळ जिल्हयात पाच व वाशीम जिल्हयात दोन असे एकूण सात शाखा ओपन केल्या होत्या. सात शाखेत ठेवीदार व खातेदारांनी यांनी कोटी रुपये जमा केले होते. फरार असलेल्या आरोपी मुख्य सुत्रधार प्रणित देवानंद मोरे, अध्यक्ष देवानंद लक्ष्मण मोरे, प्रीतम देवानंद मोरे आणि जयश्री देवानंद मोरे या चौघांना पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. दिग्रस पोलिसांनी तब्बल ३६ दिवसांच्या तपासानंतर या प्रमुख आरोपींना पकडण्यात यश मिळवले असून आज बुधवार दि. १५ जानेवारीला दिग्रस येथे सर्व आरोपींना हजर करण्यात येणार आहे. यावेळी ठेवीदार खातेदार व इतरांनी पाहणाऱ्यानी एकच गर्दी केली होती.
दिग्रस पोलीस स्टेशनला आरोपींना आणताच पाहणाऱ्यांची एकच गर्दी
यावेळी तपास अधिकारी (Investigating Officer) रामेश्वर वेंजने यांनी जमलेल्या जनसमुदायाला शांत राहण्याचे आवाहन करून त्यानंतर पोलीस ताफ्यासह दारव्हा येथील न्यायालयात हजर करण्याकरिता रवाना झाले. जनसंघर्ष निधी लि. च्या सात शाखांमधून नागरिकांचे पैसे गुंतवून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार (Financial malfeasance) केल्याचा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणी अध्यक्ष, संचालक, उपाध्यक्ष यांच्यासह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील साहिल जयस्वाल, अनिल जयस्वाल आणि पुष्पा जयस्वाल यांना आधीच अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य सूत्रधार प्रणित मोरे आणि त्याचे कुटुंबीय फरार होते.
पोलिसांचा कसून तपास
प्रकरण गंभीर असल्याने दिग्रस पोलिसांनी विशेष पथक तयार करून आरोपींच्या मागावर तपासाची चक्रे फिरवली. पुणे आणि लोणावळा परिसरात आरोपी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचून मंगळवारी त्यांना अटक केली. या अटकेने ठेविदारांना दिलासा मिळाला असून पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपली जीवनभराची कमाई गमावलेल्या ठेविदारांना आता न्यायाची आस आहे. अटकेत असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करून नुकसान भरून दिली जावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. पोलिसांनी चौकशी सुरू केली असून लवकरच घोटाळ्याचा पूर्ण उलगडा होईल, अशी अपेक्षा आहे.
पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आरोपींच्या अटकेने ठेविदारांचा विश्वास पुन्हा जागृत झाला आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपासाकडे ठेवीदार व खातेदारांचे लक्ष लागले आहे.