देसाईगंज (Gadchiroli) :- निसर्गाचा समतोल बिघडल्याचा सर्वाधिक फटका शेतकर्यांना बसत आहे .रब्बी हंगामातील धान पीक कापणी योग्य झाले असतांना दि.२१ मे रोजीच्या सायंकाळी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यात अनेक गावात वादळ वार्यांसह आलेल्या अवकाळी पावसाने धान पिकाचे अतोनात नुकसान केले आहे.अनेकांच्या शेतातील धान पीकाला झोपवले आहे.
शेतकर्यांच्या तोंडातील घास हिसकावण्याची परिस्थिती
नुकताच उन्हाचा तडाखा वाढलेला असतानाच तालुक्यात अवकाळी पावसाचे संकट आले आहे. देसाईगंज तालुक्यातील तुळशी, विसोरा, कोकडी या गावांसह तालुक्यातील इतरही गावांतील रब्बी धान पिकाला वादळी वार्यासह आलेल्या पावासाने झोपवले असून जवळपास एक ते दीड तास झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे खोलगट व नाल्या शेजारील जमिनीत व धान पीकात पाणी साचल्याने उभ्या धान पिकाचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाच्या (Unseasonal rain) भीतीने शेतकर्यांची चिंता वाढवली आहे. तुळशी, विसोरा, कोकडी व परीसरात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली आहे. धानाचा निसवा १०० टक्के होऊन धान पीक कापणी योग्य झाले आहे. काल दि. २१ मे रोजी झालेल्या अवकाळी जोरदार पावसाने उभ्या धान पीकाला चांगलाच फटका बसला असून धान पीक झोपल्याने शेतकर्यांच्या धान पिकाचे नुकसान झाल्याने तालुक्यातील शेतकरी (Farmer) चिंताग्रस्त झाला आहे. अनेकांच्या धानाच्या कडपा , धानाचे पुंजने पाण्याखाली आले आहेत. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.




