बुलढाणा(Buldhana) :- दुसऱ्या फेरीत एमबीबीएस(MBBS) प्रवेशासाठी निवड झालेल्या प्रवेशित विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीतील रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने 6 ऑक्टेबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री(Union Minister) प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.
प्रवेश निश्चित झालेल्यांना दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चितीबाबत उद्यापर्यंत मुदतवाढ !
एमबीबीएस प्रवेशाची पहिली देशपातळीवरील यादी जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले होते. त्यानंतर राज्यस्तरावरील दुसरी प्रवेश फेरी जाहीर झाली, परंतु महाराष्ट्रात तांत्रिक कारणामुळे ही दुसऱ्या फेरीची प्रवेशित यादी 27 सप्टेंबरला लागणे अपेक्षित होते मात्र ही यादी 30 सप्टेंबरच्या रात्री 8 वाजता प्रकाशित झाली. तर देश पातळीवर पहिल्या यादीतील प्रवेश रद्द करण्याची शेवटची तारीख ही 1 ऑक्टोबर अशी होती, त्यामुळे महाराष्ट्रातील एम. बी. बी. एस. च्या प्रवेशित विद्यार्थ्यांना पूर्वीच्या पहिल्या यादीतील प्रवेश रद्द करण्यासाठी केवळ एक दिवसाचा कालावधी मिळाला होता. एका दिवसात पूर्वीचा प्रवेश रद्द करून राज्य स्तरावरील प्रवेशित ठिकाणी प्रवेश घेणे शक्य नव्हते, ही समस्या प्रवेशित विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी केंद्रीय आयुष आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली. मंत्री महोदयांनी एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची ही समस्या केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या निदर्शनास आणून दिली. हा कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.
त्यानुसार एम.सी.सी.एन. ने यासंदर्भाचे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार आता एमबीबीएस.साठी पहिल्या यादीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना तो प्रवेश रद्द करून दुसऱ्या निर्देशित स्थळांवर प्रवेश घेण्याची मुदत आता 6 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे.. अशी माहिती केंद्रीय आरोग्य कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.