जवळाबाजार (Hingoli) :- साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपून एक महिना उलटला तरी एफ आर पी (FRP)प्रमाणे उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्यात हाराकिरी करणाऱ्या साखर कारखान्याला राज्य शासनाच्या (State Govt) आदेशामुळे रक्कम वाटप करावी लागणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
राज्य शासनाच्या आदेशामुळे रक्कम वाटप करावी लागणार
पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या त्रासाला कंटाळलेल्या जवळाबाजार व परिसरातील शेतकऱ्यांनी सन 1995 मध्ये तत्कालीन सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या हाकेला ओ देऊन भरभरून शेअर्स खरेदी केले होते. डॉ जयप्रकाश मुंदडा यांनी स्थापन केलेला बाराशिव हनुमान सहकारी साखर कारखाना (Sugar factory) अवघ्या पाच वर्षातच अवसायनात गेला. त्यानंतर पूर्णा साखर कारखान्याने काही दिवस भाडेतत्त्वावर चालवून नंतर विकत घेतला. त्यानंतर तोटा दाखवून पुन्हा विकला. अशाप्रकारे ज्या पूर्णा साखर कारखान्याच्या त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांना (Farmers) पुन्हा पूर्णा साखर कारखान्याच्या जोखडाखाली जावे लागले.
न्यायालयाने एफ आर पी ची मोडतोड चालणार नाही असे आदेश
कपिश्वर खाजगी साखर कारखान्याने उसाचे पहिले बिल 2210 रुपये प्रति टन काढले असून एकूण 2750 रुपये प्रति टन बिल निघेल असे गाळप हंगामा प्रसंगी सांगण्यात आले होते. मात्र उर्वरित रकमेचे किमान तीन ते चार टप्पे होणार असल्याची कुजबूज ऊस (sugar cane) उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असल्यामुळे ऊस उत्पादकांच्या मनाची घालमेल होत होती. मात्र न्यायालयाने एफ आर पी ची मोडतोड चालणार नाही असे आदेश दिल्यानंतर एक महिन्यानंतर राज्य शासनाने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणारे आदेश साखर कारखान्यांना बजावले आहेत. त्यामुळे 540 रुपये प्रति टनाप्रमाणे उर्वरित रक्कम पदरात पडण्याची आशा ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यंदा कपिश्वर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात इतर साखर कारखान्यांनी एक रकमे एफ आर पी देण्याची आशा दाखवून भरपूर उसाची पळवा पळवी केली आहे.