हिंगोली (Hingoli) :- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंर्तंगत आज हिंगोली जिल्ह्यातील ८०० भाविकांना घेऊन हिंगोली – अयोध्या (गाडी नंबर – ००७१९/००७२०) ही रेल्वे हिंगोली रेल्वेस्थानकावरून (railway station) सकाळी ११ वाजता निघाली. या रेल्वेला आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, समाज कल्याण विभाग (लातूर)चे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी हिरवा झेंडा दाखवला.
प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30 हजार रुपये
विविध रंगाच्या फुग्यांनी सजवलेली श्री राम दर्शन अयोध्या धाम (Ayodhya Dham) योजना ही रेल्वे ‘जय श्री राम’ या भाविकांच्या घोषणांनी मार्गस्थ झाली. या १४ डब्बे असेलल्या रेल्वेचे चालक दिनेश धोटे, संदीप कांबळे हे असून, विनय दखणे हे गार्ड आहेत. शासनाने राज्यातील सर्वधर्मीय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरु केली आहे. या योजनेंतर्गत प्रति व्यक्ती 30 हजार रुपये इतके अनुदान प्रवास खर्चासाठी देण्यात येणार आहे. ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन’ योजनेमध्ये भारतातील 73 व राज्यातील 66 प्रमुख तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येणार आहे. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ.सर्व बाबींचा समावेश असणार आहे.
या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात हिंगोली जिल्ह्यातील ८०० नागरिकांना आज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवून रेल्वेने अयोध्येला रवाना करण्यात आले आहे. या भाविकांसोबत एक वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सात जणाचे आरोग्य पथक तसेच त्यांच्यासोबत २५ कर्मचाऱ्यांचे पथक पाठविण्यात आले आहे.