हिंगोली (Hingoli) :- पुष्यमित्र जोशी यांना भारत सरकारतर्फे संसद भवनात देशाचा सर्वोच्च युवा पुरस्कार, राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हिंगोलीचा सुपुत्र आणि संशोधक पुष्यमित्र जोशी हा महाराष्ट्रातील एकमेव युवक आहे, ज्याची निवड वर्ष २०२०-२१ व २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी केली गेली. संसद भवनात केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण तसेच कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडविया आणि क्रीडा व युवक मंत्रालय कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मिता राजीव लोचन (प्रधान सचिव क्रीडा व युवक मंत्रालय) आणि नितेश कुमार (संयुक्त सचिव क्रीडा व युवक मंत्रालय) देखील उपस्थित होते.
गेल्या २ वर्षात महाराष्ट्रातील एकमेव युवक
राष्ट्रीय युवा पुरस्कार हा १५ ते २९ वयोगटातील युवकांना दिला जातो, जे विज्ञान, समाजसेवा, नवोपक्रम, नेतृत्व, संशोधन आणि धोरण आदी क्षेत्रांमध्ये असाधारण कार्य करतात. युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय (Ministry of Sports), भारत सरकार (Government of India) यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान केला जातो. हिंगोलीच्या इतिहासात प्रथमच पुष्यमित्र जोशी यांच्या रूपात राष्ट्रीय पुरस्कार जिल्ह्यातील नागरिकाला मिळाल्यामुळे संपूर्ण हिंगोलीत अभिमानाचे वातावरण आहे. पुष्यमित्र जोशी यांना विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरणीय धोरण, सामाजिक कार्य आणि सार्वजनिक प्रशासनातील मोलाचे योगदान लक्षात घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुष्यमित्र जोशी हे एक संशोधक, नवोपक्रमकर्ता, लेखक आणि धोरण सल्लागार म्हणून सुपरिचित आहेत. त्याच्या कार्यामुळे समाजपरिवर्तनासाठी उपयुक्त असलेले संशोधन घडवले आहे.
त्याच्या तीन संशोधनांना भारत सरकारकडून पेटंट मान्यता मिळाली आहे. कोविड-१९ च्या काळात, त्याने डिस्पोजमित्र उपकरणाचा वापर करून मास्कची सुरक्षित विल्हेवाट लावली आणि सॅनिटायझरची बाजारात कमतरता असताना त्याने स्वतःच सॅनिटायझर तयार करून गरजू लोकांना विनामूल्य वितरित केले. त्याचबरोबर, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी इम्युनो बूस्टर तयार करून हजारो लोकांना मोफत वितरित केले.
पुष्यमित्र जोशीने ‘अॅक्वामित्र’ हे पेटंटप्राप्त संशोधन विकसित केले
भारताच्या २३० हून अधिक जिल्ह्यांमध्ये पाण्यात फ्लुराईडचे (Fluoride) प्रमाण जास्त असल्यामुळे १० पेक्षा अधिक गंभीर आजार होतात. या समस्येवर उपाय म्हणून, पुष्यमित्र जोशीने ‘अॅक्वामित्र’ हे पेटंटप्राप्त संशोधन विकसित केले आहे. हे संशोधन अतिशय कमी खर्चात आणि कोणत्याही उर्जेशिवाय पाण्यातील फ्लुराईड कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे दुर्गम भागातील लोकांना मोठा फायदा होणार आहे.
पुष्यमित्र जोशी यांनी विज्ञान, पर्यावरण आणि जीवनशास्त्र यावर तीन शैक्षणिक पुस्तके लिहिली आहेत, जी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. त्याचे २० हून अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर विविध जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. त्याचे ऐतिहासिक आणि राजकीय विषयांवर लेख देखील प्रसिद्ध आहेत. त्यानी ब्रिक्स संघटनेच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम कार्यसमूहात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि जी२० जागृती यात्रेत ‘बिझ ज्ञान ट्री’ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय युवा महोत्सवात केले आणि विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. त्याला महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून ‘अविष्कार’ संशोधन फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे.
पुष्यमित्र जोशी यांचे हे ऐतिहासिक यश संपूर्ण हिंगोली आणि महाराष्ट्रासाठी एक अभिमानाचे कारण आहे. त्याच्या संशोधन आणि कार्याने देशभरातील युवकांना प्रेरणा मिळवली आहे आणि त्याच्या या कार्यामुळे हिंगोली आणि महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.