हिंगोली(Hingoli):- शहर सौदर्यीकरण या उपक्रमांतर्गत शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी नगर पालिकेच्या माध्यमातून १३ सोलार ट्री (Solar Tree) बसविण्यात आले. आज परिस्थितीमध्ये या सोलार ट्री चे पान व फांद्याही गळून पडत असल्याने त्यावर खर्ची केलेले लाखो रूपये पाण्यात गेल्याचे बोलले जात आहे.
शहर सौदर्यींकरण उपक्रमातून खर्ची केलेले लाखो रूपये गेले पाण्यात
हिंगोली शहर सौदर्यींकरणामध्ये चांगले काम करीत असताना राज्य स्तरावर हिंगोली नगर पालिकेचे नाव लौकीक झालेले आहे. या उपक्रमांतर्गत शहराला पारितोषिक प्राप्त झालेले आहे. याच माध्यमातून हिंगोली शहरातील महावीर उद्यान, हिंदू स्मशानभूमी जवळील उद्यान, रामलिला मैदान, शिवाजी उद्यान, जिजामाता नगरातील गणपती मंदीर तसेच जिल्हाधिकार्यांच्या शासकीय निवासस्थाना समोर असे एकूण १३ सोलार ट्री लावण्यात आले. एका सोलार ट्रीवर जवळपास १० लाख रूपये खर्ची घालण्यात आले. हे सोलार ट्री अंदाजे १ कोटी ३० लाख रूपयाचे शहरामध्ये बसविण्यात आले. मोठा गाजावाजा करून सोलार ट्री बसविण्यात आले असले तरी शहरवासीयांना त्यांचा कोणताच फायदा ठरला नाही. विशेष म्हणजे सोलार ट्री निकृष्ट दर्जाचे (Poor quality) बसविण्यात आल्याने त्यावर खर्च केलेले लाखो रूपये पाण्यात गेले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष घालून सोलार ट्रीवर झालेला खर्च व त्याची आजची परिस्थिती पाहावी अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.