मालवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सुराणा नगर भागात जलजीवनचे पाणी मिळत नसल्याने गैरसोय
हिंगोली (Women Handa march) : मालवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सुराणा नगर भागात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा होत नसल्याने गुरुवारी या भागातील महिलांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यास खडेबोल सुनावले.
हिंगोली तालुक्यातील मालवाडी ग्रामपंचायत हद्दिमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत काम करण्यात आले आहे. मालवाडी व चिखलवाडी या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा होतो. परंतु सुराणा नगर भागामध्ये अर्थवट काम झाले असल्याने या भागात नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या भागातील संतप्त महिलांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढून आपल्या संतप्त भावना प्रगट केल्या.
या प्रकरणी जिल्हा परिषद कार्यालयात निवेदन देण्यात आले असुन मालवाडी ग्रामपंचायत हद्दिमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत अर्धवट काम केले असल्याचा आरोप केला आहे. मालवाडी, सुराणा नगर, चिखलवाडी या भागात जलजीवन मिशन अंतर्गत नागरीकांना नळ देण्यात आलेले आहेत. यापैकी चिखलवाडी, मालवाडीला काही दिवस नळाला पाणी आले. त्यानंतर पाणी पुरवठा सोडला जातो.
परंतु सुराणा नगर भागात जलजीवन मिशन अंतर्गत नळ बसविल्यापासून नळाला एकही थेंब पाणी सोडले नाही. पाण्यासाठी नागरीकांना भटकंती करावी लागत आहे. मालवाडी अंतर्गत जलजीवन मिशनमध्ये दोन विहिरी मंजूर होऊन बांधकाम केले आहे. तसेच एका पाण्याच्या टाकीचे बांधकाम देखील करण्यात आलेले आहे. त्यामुळे सुराणा नगरात नियमित पाणी पुरवठा सोडावा अशी मागणी करण्यात आली. या शिष्टमंडळात प्रदिप बांगर, अजय जन्हाड, बाळू नागरे, सुनिता घागरे, जास्वंदी पाचमासे, इंदुबाई दराडे, सिंधू कांबळे, अयोध्या ग्राम, चंद्रकला मुदिराज आदींचा समावेश आहे.