लातूर (Latur) :- खरीप 2024-25 या वर्षीचा पीकविमा निकष आणि वाटपामध्ये मोठा घोटाळा आहे, पैसे देवून-घेवून पंचनामे करण्यात आले आहेत, असा थेट आरोप करीत एकाच गटात शेतकऱ्यांना मिळालेल्या पीकविमा रकमेत मोठी तफावत आहे. खूप कमी प्रमाणात शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला असून 80 टक्के शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत. परिणामी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रोष आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पीकविमा समितीची तातडीने बैठक घ्यावी आणि संबंधित पिक विमा कंपनीची चौकशी करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या मागणीचा विचार तात्काळ नाही झाला तर एसबीआय पीकविमा कंपनी विरोधात शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेने (Shivsena) दिला आहे.
एकाच गटात मिळालेल्या पीक विमा रकमेत मोठी तफावत!
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन दाणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी (दि.17) जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांची भेट घेऊन निवेदन दिले. 2024-25 या आर्थिक वर्षाखेरीज एकूण किती शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे, याची माहिती द्यावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. लातूर जिल्ह्यात पीकविम्याचे एकूण किती लाभार्थी आहेत व त्याचा निकष काय, याची यादी जाहीर करावी. पीकविमा लाभार्थीपैकी मंजूर झालेले शेतकरी व पीकविमा (Crop insurance) मंजूर न झालेले शेतकरी, तसेच या कारणासाठी पिक विमा मंजूर झाला नाही, त्या कारणासहित शेतकऱ्यांना (Farmers) व प्रशासनाला पोर्टल द्वारे माहिती कळवावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. पिकांच्या झालेल्या पंचनाम्याची प्रत द्यावी, बोगस पीकविमाबाबतीत पडताळणी व कार्यवाही करावी. त्याचबरोबर पीकविमा वाटपातील तफावतीबाबत स्पष्टीकरण द्यावे. पीकविमा कार्यालय बंद असून ते चालू ठेवावे, अशा मागण्या यावेळी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या.