रेणापूर (Latur):- पोलिसांचेच नव्हे, तर अधिकाऱ्यांचेही काही बरे नव्हे, असे प्रकार पोलीस यंत्रणेत घडत आहेत अन् हे वरिष्ठ अधिकारी खपवून घेत आहेत. अवैध धंदेवाल्यांचे गुलाम झालेल्या काही पोटभरुंमुळे पोलिसांच्या राज्यात फौजदारच सुरक्षित नाहीत. मारहाणीनंतर ज्या फौजदार घुले यांनी तक्रार अर्ज लिहिला, तो अर्ज ‘शुध्द’ करण्यासाठी घुले यांना कुणी गळ घातली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान भाजपा (BJP) आंदोलनाच्या दणक्याने संबंधित रेणापूर ठाणे प्रमुखाचा तबादला करण्यात आला आणि फौजदार घुले मारहाण प्रकरणी मटका बुकी चालकासह २५ ते ३० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला.
तक्रार अर्ज बदलण्यासाठी घुलेंना घुलविले कुणी?
मटका बुकी चालकाकडून मारहाण (beating) झालेल्या रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हणमंत घुले यांनी पोलीस स्टेशनमध्ये(Police Station) येवून मटका बुकी चालकाने आपणास जिवे मारण्याचा प्रयत्न केला असे सांगत मदतीसाठीची मागणी केली, मात्र त्यांना मदत सोडा, धीरही मिळाला नाही. घुले यांनी त्याचवेळी तक्रार लिहित ‘कोणीच मदतीला आले नाहीत. पो.स्टेशन मधीलच तिघेजण माझ्या विरोधात आहेत. येथील पोलीस अधिकारी ही माझ्या विरोधात आहेत. याबाबत मी वरिष्ठ अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि घरच्यांना सांगितले होते. मटका बुकी चालकाने मारले यात ही पो.स्टेशन मधील काही जणांचे हात आहेत, असे त्यात म्हटले होते. त्यावर दोन दिवस दखल घेतली गेली नाही. परंतु, तिसऱ्या दिवशी वेगळीच तक्रार घेवुन गुन्हे दाखल झाले. तर मग पहिली तक्रार मागे घेवुन दुसरी तक्रार नोंदविण्यासाठी पो.उपनिरीक्षक हणमंत घुलेंना कुणी घुलविले ? याबाबत चर्चेला ऊधाण आले आहे.
२५ ते ३० जणांवर गुन्हे दाखल
त्यानुसार मटका बुकी चालक कुमार ससाणे (रा. पळशी) व इतर २५ ते ३० जणावर गु.र.नं. व कलम -233/2024 कलम 353, 307, 294, 143, 147, 148, 149, 341, 323, 506 भादंवि सहकलम 4, 25 भारतीय हत्यार (weapon) कायदा प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. एका पोलीस अधिकाऱ्यास अवैध धंदेवाले खाकी वर्दीचा मुलाहिजा न बाळगता भर रस्त्यावर वर्दी फाडून मारीत असतील आणि त्यावेळी तो अधिकारी आपल्या वरिष्ठाकडे, सहकाऱ्यांकडे मदत मागत असेल आणि त्याकडे जर सहकारी दुर्लक्ष करुन मस्तवाल गुंडाची पाठराखण करत असतील तर मग ” सद्रक्षणाय- खल निग्रहणाय’ नेमके कुणा साठी?
पो.नि.अशोक अनंत्रे नियत्रंण कक्षात
गुन्हेगारांना पाठीशी घालणारे, अवैध धंद्यांना पाठबळ देणारे आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणारे असे आरोप करीत रेणापूर पो. स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे यांचे तात्काळ निलंबन करावे, या मागणीसाठी रेणापुर तालुका भाजपाने पोलीस स्टेशन समोरच दोन तास ठिय्या दिल्याने जिल्हा पोलीस उपअधीक्षक गजानन भातलोंढे यांनी अनंत्रे यांची तडकाफडकी उचल बांगडी करून जिल्हा नियंत्रण कक्षात बदली केली गेली.