अकोट (Akot):- येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी पोलिस स्टेशन अकोट शहरमधील आरोपी विक्की उर्फ सतीश विलास तेलगोटे (२३) रा. खानापूरवेस अकोट या आरोपीविरूध्द लोखंडी भात्याचे पाते बरगडीत खुपसून ठार मारल्याप्रकरणी गुन्हा सिध्द न झाल्याने आरोपीला न्यायालयाने कलम ३०२ मध्ये निर्दोष मुक्त केले. मात्र २९४, ३२३ आणि ३०४ (२) भादंविचे कलम सिद्ध झाल्याने आरोपीला १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा(Punishment of hard labour) सुनावली.
गंभीर जखमी करून खून
आरोपीच्या प्राधान्याच्या कारावासाच्या (Imprisonment)शिक्षा त्याने संयुक्तपणे म्हणजे एकत्रितरीत्या भोगावयाच्या आहेत. मात्र द्रव्यदंड न भरल्यास भोगावयाच्या वैकल्पिक कारावासाच्या शिक्षा आरोपीने स्वतंत्रपणे म्हणजे एकानंतर दुसरी अशा भोगावयाच्या आहेत. फिर्यादी देवेंद्र नारायण मोरे (४६) रा. फरकाडे नगर, अकोट याने फिर्याद दिली की, २७/१०/२०१९ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास अकोट शहरातील खानापूरवेस येथील धनराज तेलगोटे यांच्या पानठेल्यावर आरोपी विक्की उर्फ सतिश विलास तेलगोटे तेथे आला व पाणी पिऊन तेथे उपस्थित असलेल्या सफल शिलानंद तेलगोटे याच्या अंगावर थुंकला व त्यास शिवीगाळ केली व त्याचा गळा पकडला असता फिर्यादीचा मुलगा रोहित मोरे याने आरोपी याच्या हाताला झटका दिला व सफल याच्या अंगावर का थुंकतो, असे म्हटले असता आरोपीने त्याच्याजवळील भाल्याच्या पात्याने रोहित मोरे याच्या डाव्या छातीत खुपसून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून (murder)केला.
या फिर्यादीच्या जबानीवरून गुन्हा दाखल होऊन तपास करण्यात आला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील पी.बी. सहारे यांनी आरोपीविरूद्धचा गुन्हा सिध्द करण्याकरिता १२ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयाच्या खटल्यामध्ये नोंदविल्या. या प्रकरणामध्ये आरोपीविरूध्द कलम ३०२ चा गुन्हा(crime) सिद्ध झाला नाही; मात्र २९४, ३२३ भादंवि सहकलम ४, २५ आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा सिध्द झाल्याने आरोपीला शिक्षा सुनावली. शिक्षेसंबंधी सुनावणीदरम्यान न्यायालयात(Court) सरकारी वकील सहारे यांनी युक्तिवाद केला की, आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून शिक्षेमध्ये दयाबुध्दी दाखविल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीला सदर शिक्षा ठोठावली. या प्रकरणात तपासी अंमलदार म्हणून एपीआय धीरज चव्हाण यांनी तपास करून दोषारोपपत्र सादर केले. पैरवी अधिकारी म्हणून पोहेकाँ प्रकाश जोशी यांनी सहकार्य केले.