परभणी (Parbhani):- आरएसएसची (RSS) विचारधारा ही संविधान विरोधी आहे. परभणीत सोमनाथ सुर्यवंशी हा संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलनात उतरला होता. मात्र सोमनाथ हा दलित होता, तो संविधानाचे रक्षण करत होता. म्हणून पोलिसांनीच त्याची हत्या केल्याचा गंभीर आरोप लोकसभा सभागृहातील विरोधी पक्षनेते राहूल गांधी (Rahul Gandhi)यांनी परभणीत माध्यमांशी बोलताना केला आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला
परभणीत १० डिसेंबर रोजी संविधान प्रतिकृती विटंबनेच्या घटनेनंतर ११ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या आंदोलन चिघळले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यात सोमनाथ सूर्यवंशी या विधीशास्त्र शाखेच्या विद्यार्थ्याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे (Congress) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी सोमवार २३ डिसेंबर रोजी परभणीत दाखल होत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना राहूल गांधी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ही संविधान विरोधी आहे. परभणीत घडलेल्या संविधान विटंबनेनंतर झालेल्या आंदोलनात सहभागी होत सोमनाथ हा संविधानाच्या रक्षणार्थ उतरला होता.
मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट
मात्र मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात (Autopsy) स्पष्ट आहे. तरीही मुख्यमंत्री अधिवेशनात खोटे बोलले आहेत. सभागृहात चुकीची माहिती दिली. सोमनाथची कोठडीत हत्याच झाली आहे. शासन पोलिसांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र ज्यांनी हे कृत्य केले, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असे राहूल गांधी म्हणाले. सदर प्रकरणात पिडीतांना न्याय मिळाला पाहिजे, यात कोणतेही राजकारण नसल्याचे राहूल गांधी यांनी स्पष्ट केले. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole), विजय वडेवट्टीवार(Vijay Wadettiwar), माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खा. चंद्रकांत हंडोरे, खा. वर्षाताई गायकवाड, खा.प्रणिती शिंदे, आ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, अॅड. मुजाहिद खान, खा. संजय जाधव, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी आ. सुरेश देशमुख, बाळासाहेब देशमुख, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे आदी उपस्थित होते.