विश्रामगृहावर जाणाऱ्या रस्त्याचे काम कधी सुरू होणार?
मानोरा (Road full of potholes ) : रस्ते इमारती पूल विकासाचे पहिले पाऊल हे ब्रींद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात ठळक अक्षरात लिहिलेले असतें, गाव, खेडी तांडा, वाडी वस्तीच्या रस्त्याच्या कामाची दर्जा सुधारत असताना मानोरा येथील विश्रामगृहाला जाणारा आणि राष्ट्रीय मार्गाला जोडलेला रस्ता हा अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावरून ये – जा करणाऱ्यांचे अनेक वेळा किरकोळ अपघात होऊन दुखापतही झालेली आहे. या रस्त्याला लागून तहसील कार्यालय तसेच मुंगसाजी नगर, धान्य मार्केट व चिंतामणी शाळा असल्याने या रस्त्यावरून नेहमीच वाहनाची वर्दळ असल्याने हा रस्ता दर्जेदार असणे गरजेचे असताना या रस्त्याच्या बांधकामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुर्लक्ष का? मागील वर्षभरापूर्वी विश्रामगृहाची डागबुजी मोठ्या दिमाखात झालेली असून या डागबुजीच्या कामात या रस्त्याची मलमपट्टी झाल्याचेही अधोरेखित होते. विश्रामगृहाचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विश्रामगृहाची डागबुजी व सौंदर्यीकरण होते तर मग रस्त्याची दुरुस्ती का नाही ? असा सवाल करत तातडीने रस्ता तयार करण्याची मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी केली आहे.
मानोरा शहर हे देशात प्रसिद्ध असून बंजारा काशी पोहरादेवी येथे नंगारा वस्तूची लौकिकता असल्याने पर्यटकांसाठी हा नंगारा आकर्षित केंद्र बिंदू झाल्याने राज्यभरातील भाविक भक्त काशी पोहरादेवीकडे प्रयाण करीत करतात. अनेक व्हीआयपी मान्यवर या विश्रामगृहात हजेरी लावतात, परंतु ये – जा करताना हा विश्रामगृह नको रे बाबा अशी बोलकी प्रतिक्रिया येथे थांबण्यासाठी येणारे मान्यवर व्यक्त करून जात आहेत. तेव्हा या रस्त्याचे भाग्य कधी उजळणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे. या रस्त्याला लागूनच असलेल्या तहसील कार्यालयाची इमारत, नगर पंचायतीची इमारत असे वेगवेगळे विकास कामे होत असताना विश्रामगृहाच्या रस्त्याचे विकास काम का रखडले, हा यक्ष प्रश्न असुन तेव्हा रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी आता काही लोकप्रतिनिधीमधून होत आहे.




