एटापल्ली येथील आढावा बैठकीत खा. डॉ. नामदेव किरसान यांचे निर्देश
गडचिरोली (MP Dr. Namdev Kirsan) : आदिवासी बहुल एटापल्ली तालुक्यात अनेक समस्या प्रलंबित आहेत. या समस्या येत्या ६ महिण्यात निकाली काढण्यात याव्यात असे निर्देश गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्राचे खा. डॉ. नामदेव किरसान यांनी दिले.
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. नामदेव किरसान (MP Dr. Namdev Kirsan) यांनी एटापल्ली येथे नुकतीच आढावा बैठक घेतली. या बैठकीत तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. या वेळी सर्व विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना खा. डॉ. किरसान म्हणाले, ‘दुर्गम भागातील जनतेला त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले जाणार नाही. शासनाच्या योजना आणि सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. यासाठी तात्काळ कृती हवी आहे. प्राथमिक स्वरूपाच्या समस्या तातडीने सोडवाव्यात आणि उर्वरित सर्व समस्या येत्या ६ महिन्यांच्या आत निकाली काढाव्यात असेही निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलावार, एटापल्ली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा दिपयंती पेंदाम, काँग्रेस आदिवासी सेलचे अध्यक्ष हनुमंतु मडावी, अनुसूचित जाती विभाग सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश गंपावार, अहेरी तालुकाध्यक्ष पप्पू हकिम, काँग्रेस पदाधिकारी मुस्ताक हकीम, लोकेश गावडे, प्रज्वल नागूलवार यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी आणि तालुक्यातील सर्व प्रमुख विभागांचे प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान विविध विभागांनी त्यांच्या कामकाजाचा आढावा दिला व नागरिकांच्या मागण्यांवर आधारित योजना आणि पुढील कार्यपद्धती यावर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये विकास कामांचा प्रगती अहवाल, शासकीय योजना राबवण्याची गती, नागरिकांना मिळणार्या सेवा आणि येणार्या अडचणी यांचा समावेश होता.