परभणी (Parbhani):- नुकतेच शिवसेनेत (शिंदे गट) पुन्हा प्रवेश केलेले सईद खान यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी विशेष न्यायालयाने (Courts) फेटाळली आहे . सईद खान आणि भावना गवळी यांनी १८ कोटी रुपयांची बनावट कागदपत्रे आणि फसवणुक(Fraud) करून ट्रस्टचे खासगी कंपनीत रुपांतर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधिश ए.सी.डागा यांचा निर्णय
महिला उत्कर्ष प्रतिष्ठान नावाच्या संस्थेतील निधीमध्ये अपहार केल्याचा आरोप सईद खान यांच्यावर असून त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. जामिनावर सुटका झाल्यानंतर, त्यांनी प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी अर्ज केला होता. त्यात त्यांनी आपण निर्दोष असून कधीही संस्थेचे पदाधिकारी नसल्याचा तसेच संस्थेचे कंपनीत रुपांतरित झाल्यानंतरच आपण अध्यक्ष झाल्याचा दावा केला होता. दरम्यान विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. सी. डागा यांनी त्यांची दोषमुक्ती मागणी फेटाळताना खान यांनी पडद्यामागून भूमिका बजावली असून त्यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत, असे १३ जानेवारी रोजी दिलेल्या निर्णयात नमूद केले आहे.
आरोपी हा संस्थेचा पदाधिकारी किंवा प्रभारी नव्हता, मात्र याचा अर्थ असा नाही की पदाधिकारी नसलेली व्यक्ती संस्थेच्या व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. याप्रकरणी पडद्यामागील व्यक्तीला समोर आणणे आवश्यक आहे. या प्रकरणात, अर्जदार पडद्यामागून काम करत असल्याचे पुराव्यांतून दिसते, असे सकृतदर्शनी मतही न्यायालयाने नोंदवले आहे.