विद्यार्थी संचलन व मानवी साखळी
हिंगोली (Shaheedi Tribute) : शिख धर्माचे ९ वे गुरु, श्री गुरु तेग बहादूरजी साहिब यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी वर्षाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने शहरात विद्यार्थ्यांनी भव्य कवायत संचलन व मानवी साखळी करून त्यांना अनोखी मानवंदना दिली. या उपक्रमातून गुरु तेग बहादूरजींच्या महान बलिदानाचे स्मरण करत सामाजिक ऐक्य, एकोपा आणि सहिष्णुतेचा संदेश देण्यात आला.
हा कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. यावेळी शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के व गटशिक्षणाधिकारी दत्तराव नांदे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील विविध नामांकित शाळांमधील सुमारे ५५० विद्यार्थ्यांनी या भव्य संचलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पांढऱ्या गणवेशातील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एक भव्य मानवी साखळी तयार करून गुरु तेग बहादूरजींच्या शहिदी दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण केली.
या उपक्रमात कन्या प्रशाला, सेक्रेड हाय स्कूल, सरस्वती विद्या मंदिर, मौलाना आझाद स्कूल, भारती विद्या मंदिर, खाकीबाबा विद्यालय, सरजूदेवी स्कूल व माणिक स्मारक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग लाभला. “गुरु तेग बहादूरजींनी धर्म, मानवता आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान अतुलनीय आहे. त्यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी निमित्त आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून देणारा आणि प्रेरणादायी आहे,” असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रप्रमुख शेषराव असोले, व्यवहारे, श्री. गंगावणे, श्री. अंभोरे, श्री. रिझवान, श्री. गजानन गीते व विजय बांगर यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे संपूर्ण हिंगोली शहरात देशभक्ती, श्रद्धा आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले.




