दुबार पेरणी व पिक नष्ट झाल्याची नुकसान भरपाई द्यावी
मानोरा (Sowing and crops) : तालुक्यातील रोहना येथील एका कुटुंबातील तीन शेतकऱ्यांची १२ एकर शेती मौजे साखरडोह शिवारात असुन शेतात (Soybean crops) सोयाबीन व तूर पिकांची पेरणी केलेली आहे. मात्र हुमनी अळी आणि बुरशीमुळे संपूर्ण पिक नष्ट झाल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणी केली आहे. तरी पाहणी करून दुबार पेरणीची आर्थिक मदत देवून पिक नुकसानीची भरपाई द्यावी, असे निवेदन तहसीलदार व तालुका कृषि अधिकारी यांना शेतकरी प्रल्हाद पवार यांनी दिले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, साखरडोह शिवारात गट क्र. ९७ मध्ये आम्हा तीन शेतकऱ्याची ७ हेक्टर ९७ आर शेती असून शेतामध्ये २४ जून रोजी (Soybean crops) सोयाबीन व तूरची पेरणी केलेली होती. मात्र सदर पिक काही दिवसांनी थोडे मोठे झाल्यावर त्यावर हुमनी अळी व बुरशीमुळे शेतातील संपूर्ण पिक नष्ट झाले आहे. सदरील शेतातील पिकावर ट्रॅक्टर फिरवून दुबार पेरणी केली आहे. त्यामुळे पिकांची पाहणी व पंचनामा करून दुबार पेरणीसाठी मदत व पिकांची नुकसान भरपाई द्यावी, असे निवेदन दिले आहे. निवेदनावर शेतकरी मिराबाई पवार व अर्जून पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ओमनी अळी आणि बुरशीमुळे संपूर्ण पिक नष्ट झाले आहे. कर्ज काढून दुबार पेरणी केली आहे. त्यामुळे अंगावर कर्ज झाला आहे. त्यामुळे पिकांची पाहणी व सव्हेक्षण करून दुबार पेरणी व नष्ट झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी पिडीत शेतकऱ्यांनी केली आहे.
– मिराबाई पवार, शेतकरी




