कारंजा(Karanja):- शेत नांगरण्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी (fight) झाल्याची घटना १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास तालुक्यातील काजळेश्वर उपाध्ये शेतशिवारात घडली. याप्रकरणी दोन्ही गटाकडून कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहे. ज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) माजी अध्यक्ष ज्योती गणेशपुरे यांचाही समावेश आहे.
फिर्यादी सुभाष वासुदेवराव उपाध्ये (५५) हे शुक्रवारी शेतात फेरफटका मारण्याकरिता गेले असता आरोपी स्वप्नील नितीन वानखडे (३५) हा फिर्यादीच्या शेतात नांगरणी करीत होता. याबाबत फिर्यादीने त्यास हटकले असता आरोपी लगबगीने गावात गेला व अनिल आनंदराव गणेशपुरे (५५), ज्योती अनिल गणेशपुरे (५०), वैभव अनिल गणेशपुरे (२५) , प्रतिक अनिल गणेशपुरे (२७) व रितेश उंबरकर (२१, सर्व रा. काजळेश्वर) यांना घेऊन आला व त्यांनी संगनमत करून फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर गावात जावून आरोपी प्रतिक गणेशपुरे याने फिर्यादीच्या पत्नीस शिवीगाळ करून व जीवे मारण्याची धमकी (Death threats)दिली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध कलम १४३, २९४, ३२३, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
तसेच दुसऱ्या गटाकडून स्वप्निल नितीन वानखडे (३५) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार फिर्यादी हा स्वतः च्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करीत असताना आरोपींनी संगनमत करून त्यांच्या हातावर कुऱ्हाडीचा दांडा व डोक्यात विळ्याची मूठ मारून जखमी केले. तसेच खाली पाडून लाथाबुक्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीचा मित्र शंकर अशोक उंबरकर याला आरोपीने लाकडी काठीने मारहाण केली. तसेच आरोपींनी ट्रॅक्टरची नळी कापून त्यामधील डिझेल सांडवले व ट्रॅक्टरचे नुकसान केले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सुभाष वासुदेव उपाध्ये (५५), कार्तिक सुभाष उपाध्ये (२४), पुष्पक सुभाष उपाध्ये (२२), हर्षल ओंकार उपाध्ये (३२), दिनेश ओंकार उपाध्ये (सर्व रा. काजळेश्वर) यांच्या विरुद्ध कलम १४३, १४७, १४८, ३२४, ३४१, २९४, ४२७, ५०६, ३२३ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड करीत आहे.