मानोरा(Washim):- तालुक्यातील कुपटा मंडळात माहे फेब्रुवारी अवेळी झालेल्या गारपिटीने अनेक शेतकऱ्यांचे गहू आणि हरभऱ्याचे अतोनात नुकसान झाले, मात्र तलाठी (Talathi) व कृषि सहाय्यक यांच्या मार्फत करण्यात आलेले पंचनामे आर्थिक घेवाण देवाण करण्यात आल्यामुळे अनेक खरोखर नुकसान झालेले शेतकरी (Farmer)शासनाच्या अनुदानापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या नावाचा समावेश करून न्याय द्यावा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडण्याच्या इशाऱ्याचे निवेदन दि. १९ सप्टेंबर रोजी नायब तहसीलदार अष्टुरे यांना जिल्हा परीषदेचे सदस्य उमेश ठाकरे यांच्या नेतृत्वात वंचित शेतकऱ्यांनी दिले आहे.
अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा वंचित शेतकऱ्यांचा इशारा
निवेदनात नमूद केले आहे की, कुपटा मंडळात माहे फेब्रुवारी मध्ये अवेळी अवकाळी गारपीट झाली होती. त्यावेळी शेतकऱ्यांचे हरभरा व गहूचे अतोनात नुकसान (damage) झाले होते. काही दिवसांनी तलाठी व कृषि सहाय्यक यांनी पंचनामा केला. त्यांनी केलेल्या पंचनाम्यात ज्या शेतकऱ्यांच्या शेतात गहू व हरभरा नाही अश्या शेतकऱ्यांचे पात्र यादीमध्ये नावाचा समावेश आहे. यावरून लक्षात येते की, आर्थिक देवाण घेवाण करून संबंधितांनी यादी तयार केलेली आहे. त्यामुळे जे पात्र शेतकऱ्यांची नावे पात्र यादीमधून सुटलेले आहे, त्या सर्वांचे नाव यादीत समावेश करावा अन्यथा कुपटा मंडळातील सर्व शेतकरी रास्ता रोको आंदोलन करणार असा इशारा महसूल व कृषि विभागाला निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी दिला आहे. निवेदन देतेवेळी शेतकरी नागोराव राठोड, रविंद्र दीघडे, अतीक भाई, सरपंच वसंता पवार, विजय घोडे, विठ्ठल राठोड, रावसाहेब देशमुख, बाला राठोड, मनोहर श्याम सुंदर, गोवर्धन चव्हाण व कुपटा मंडळातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.