अहमदपूर (Latur):- मुख्यमंत्री(Chief Minister) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांचे झ्युरिक, स्वित्झर्लंड येथे बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडतर्फे मराठमोळ्या पद्धतीने महाराष्ट्र गीत गाऊन, लेझीमच्या साथीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उदगीर तालुक्यातील गंगापूरचा मूळ रहिवासी व अहमदपूर येथील यशवंत विद्यालयाचा माजी विद्यार्थी सॉफ्टवेअर इंजिनिअर महेश बिरादार यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक करत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात ग्रामीण महाराष्ट्राचा विकास झाल्याचे मत मांडले.
मला या प्रेमातच राहायचे आहे…
या स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैश्विक मराठी परिवारातील आपल्या मराठी बंधू-भगिनींशी मनमोकळा संवाद साधला. मराठी माणसांची संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘बृहन्महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडच्या प्रेमाचे मोल नाही, मला या प्रेमातच राहायचे आहे’. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, आपला महाराष्ट्र भारताचे पॉवर हाऊस असून देश 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था झाल्यानंतर एक ते दोन वर्षांतच महाराष्ट्र पहिली उपराष्ट्रीय ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल. एआय तंत्रज्ञानात आघाडी घेतलेला महाराष्ट्र भारताचे डेटा सेंटर कॅपिटल असल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी तयार करणार असल्याचे सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला देव, देश, धर्माकरता लढायला शिकवले
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला देव, देश, धर्माकरता लढायला शिकवले, आपल्या संस्कृतीचा, भाषेचा अभिमान बाळगायला शिकवले, ती शिकवण मराठी माणसाने स्वित्झर्लंडमध्येही (Switzerland) जपली आणि पुढच्या पिढीलाही दिली, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला असून मराठीला ज्ञानभाषा म्हणून प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी स्वित्झर्लंडसह वैश्विक मराठी परिवारातील मराठी बंधु-भगिनी आमचे राजदूत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. याप्रसंगी बृहन्महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अमोल सावरकर, सेक्रेटरी किर्तीताई गद्रे, महेश बिरादार, स्विझर्लंड स्थित सर्व मराठी कुटुंब व इतर मान्यवर उपस्थित होते. अहमदपूर येथील यशवंत विद्यालयात पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण झालेला महेश बिरादार याला मुख्यमंत्र्यांचे स्वागत व मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली असता त्याने ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र बदलत असून, रस्ते, विद्युतीकरण ग्रामीण भागातील लोकांना मिळत असल्याचे यावेळी सांगितले.