Parbhani :- परभणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चु कडू (Minister of State Bachchu Kadu) यांनी शुक्रवारी सायंकाळी परभणी तालुक्यातील माळसोन्ना येथे नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या (suicide) केलेल्या सचिन जाधव (वय वर्ष ३४) व ज्योती सचिन जाधव (वय वर्ष ३०) या तरुण शेतकरी दांपत्याच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान, त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना मोबाईलवरून शासकीय मदतीबाबत विचारणा केल्यानंतर लगेच यंत्रणा हलली आणि तासाभरात जाधव कुटुंबियांना जिल्हा प्रशासनाकडून आर्थिक मदत सुपुर्द करण्यात आली.
माळसोन्ना गावात बच्चू कडू यांची भेट; उपजिल्हाधिकाऱ्यांना कॉल करताच यंत्रणा हलली
सततची नापिकी व थकलेल्या कर्जामुळे आत्महत्या केलेल्या सचिन जाधव यांच्या आत्महत्येची बातमी कळल्यानंतर त्यांच्या पत्नी ज्योती जाधव यांनी देखील आत्महत्या केली. त्यावेळी त्या सात महिन्याच्या गरोदर होत्या. याचा अर्थ व्यवस्थेने दोन नाही तर तीन जीवांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडले, हे राज्य व केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गेलेले बळी आहेत असे यावेळी बच्चू कडू म्हणाले. एवढी मोठी घटना घडल्यानंतर गावामध्ये तलाठी व तहसीलदार पंचनामा करण्यासाठी किंवा मदतीसाठी आले नाही अशी माहिती गावकऱ्यांनी दिल्यानंतर श्री.कडू यांनी तहसीलदार संदीप राजपुरे यांना फोन लावला, परभणीचे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांना फोन लावून जाधव कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत करण्याबाबत व शासकीय योजना मंजूर करून त्यांना त्याचा लाभ देण्याबाबत सूचना दिल्या.
श्री.कडू यांनी उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे यांना केलेल्या कॉल नंतर एका तासातच तहसीलदार राजपुरे हे आर्थिक मदत घेऊन माळसोन्ना येथील जाधव कुटुंबीयांच्या घरी पोहोचले. त्यांना आर्थिक मदत देऊन पुढील सर्व मदतीसाठीची कार्यवाही करण्याचे आश्वासन जाधव कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. यावेळी कडू यांच्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, तालुकाप्रमुख उद्धव गरुड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माळसोन्ना गावातील नागरिक उपस्थित होते.