सागद येथे दलित वस्तीची विंधन विहिर खासगी व्यक्तीच्या शेतात
हिंगोली (Hingoli) :- तालुक्यातील सागद येथे पिण्याच्या पाण्याकरीता २२ एप्रिल रोजी महिलांनी जिल्हा परिषद (Zilla Parishad) कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. सदर प्रकरणी प्रशासनाने विधन विहिरीचे पाणी उपलब्ध करून द्यावे व जलजीवन मिशन योजनेचे काम तातडीने पूर्ण करावे अन्यथा जि.प. समोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी महिला जि.प. कार्यालयावर धडकल्या
सागद येथील पाणी प्रश्नाकरीता जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. गावामध्ये जलजीवन मिशन (Jal Jeevan Mission) योजनेतंर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण आहे. या शिवाय जलजीवन मिशन अंतर्गत विहिरी घेण्यात आली असताना त्या ठिकाणी पाणी नाही, यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत असताना उन्हा तान्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
गावातील दलित वस्तीमध्ये पाणी पुरवठ्याची विंधन विहिर मंजूर करण्यात आली होती. परंतु ही विंधन विहिर एका शेतामध्ये घेण्यात आल्याने सदर शेतकरी (farmer) विंधन विहिर आपल्याच मालकीची असल्याचे सांगुन पाणी देण्यास नकार देत आहे. त्यामुळे प्रशासनाने विंधन विहिरीचे पाणी उपलब्ध करून जलजीवन मिशन योजनेची कामे पूर्ण करून ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सोडवावा असा इशारा देण्यात आला आहे. महिलांनी जि. प. वर हंडा मोर्चा काढल्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणी पुरवठा करण्याकरीता हालचाली सुरू केल्याचे सुत्राकडून समजते. या दिलेल्या निवेदनावर अर्चना गरड, सुमनबाई इंगोले, वंदना हनवते, ज्योती मोरे, सोनुबाई मनवर, ज्योती प्रकाश मोरे, गिताबाई भगत, कांताबाई धवसे, गयाबाई इंगोले, अर्चना भगत, शारदा इंगोले, निलिमा इंगोले, सविता वाढवे आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या (signatures) आहेत.