धरणाचे चार दरवाजे उघडले!
परभणी (Yeldari Dam) : परभणीच्या जिंतूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या पावसाच्या मालिकेमुळे येलदरी धरणात जलप्रवाह वाढला असून ५ नोव्हेंबर सकाळी सहा वाजेच्या सुमारास धरणाने शंभर टक्के क्षमतेचा टप्पा पार केला आहे. पाणीपातळी ईशारा पातळीवर (४६१.७७२ मीटर) पोहोचली असून, धरणाचे चार दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले आहे तरी धरण परिसरातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी म्हणून प्रशासनाने आव्हान केले आहे
पाणीसाठ्याचा तपशील (दलघमीमध्ये)-
मृत पाणीसाठा : १२४.६७०
जिवंत पाणीसाठा : ८०९.७७०
एकूण पाणीसाठा : ९३४.४४०
यामुळे धरणाची साठवणूक क्षमता १०० टक्के इतकी पूर्ण झाली आहे. मागील २४ तासांत ६.५१० दलघमी (१९६१.१२५ दलफूट) इतकी पाण्याची आवक झाली आहे.
पाऊसस्थिती व विसर्ग!
यंदाच्या हंगामात आतापर्यंत ९३५ मिमी पाऊस नोंदवण्यात आला आहे. धरणातील पाणीसाठा वाढत असला तरी सध्या मुख्य चार दरवाजे अर्ध्या मीटरने उघडून पाणी सोडण्यात आले आहे तथापि, विद्युत निर्मिती केंद्रातून २७०० क्यूसेक इतका नियंत्रित विसर्ग सुरू आहे.
परभणी प्रशासन सज्ज!
धरणाची ईशारा पाणीपातळी ४६१.७७२ मीटर तर धोका पातळी ४६२.३८० मीटर आहे. सध्याची पाणीपातळी ईशारा मर्यादेवर पोहोचल्याने धरण विभागाने खबरदारीचे आदेश जारी केले आहेत. खालच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पाण्याच्या आवक व हवामान परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
परिसरात निसर्गरम्य दृश्य!
धरण परिसरात सध्या पाणीपातळी वाढल्याने निसर्गरम्य दृश्य निर्माण झाले आहे. पाण्याचा नाद, हिरवागार डोंगर आणि पाण्यावर चमकणारे सूर्यकिरण यामुळे पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. रविवारपासून सुटीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
येलदरी धरणाने पुन्हा एकदा परभणी व,हिंगोली जिल्ह्याचा जलसाठा सुरक्षित केला असून, शेती व पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने ही आनंदवार्ता ठरत आहे.




