Gadchiroli :- महिलांचे आरोग्य हे संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आरोग्याशी थेट जोडलेले आहे. याच उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या (State Govt) मार्गदर्शनाखाली १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आयुष्मान आरोग्य मंदिरे , प्राथमिक आरोग्य केंद्रे , ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालये येथे या अभियानांतर्गत आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशेष अभियान
या शिबिरांमध्ये महिलांसाठी प्रतिबंधात्मक, आरोग्यवर्धक आणि उपचारात्मक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील. उच्च रक्तदाब, मधुमेह, स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य रोगांची तपासणी केली जाणार आहे. तसेच रक्तक्षय तपासणी, क्षयरोग व सिकल सेल तपासणी, गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व काळजी , माता व बाल संरक्षण कार्ड वितरण, तसेच लसीकरण सेवा पुरविण्यात येतील असेल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी सांगितले आहे. महिलांसाठी पोषण, मासिक पाळीची स्वच्छता व निरोगी जीवनशैली याविषयी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन होणार असून, रक्तदान शिबिरे व मानसिक आरोग्याबाबत समुपदेशनही करण्यात येईल. याशिवाय आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (Public Health Scheme) यांसाठी नोंदणी व मदत डेस्कही उपलब्ध राहील.
जागरूकता वाढविण्यासाठी शिबिरांच्या आयोजनात लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे. समुदायातील प्रत्येक महिलेला शिबिराची माहिती मिळावी यासाठी घराघरात जाऊन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ माधुरी किलनाके यांनी सांगितले.