मुलींनो सर्वोच्च पदावर जाण्याचं होण्याचं स्वप्न पहा!
मा. लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई यांचा सिंधुताईंच्या लेकींशी भावनिक संवाद
पुणे/ अमरावती (Mamta Bal Sadan) : गडेघाट म्हणजे मोकाट जनावरांचा कोंडवाडा. त्यामध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांना कोंडल्या जाते, याच फ्रेजरपुरा भागातील मराठी शाळेमधून भूषण गवई यांनी शिक्षण घेतले. “माझ्या मुलाने भूषणने खेड्यातून शिक्षण घेत सरन्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास केला. पण हा प्रवास त्याचा एकटा नव्हता. त्यामागे त्याची जिद्द, अफाट परिश्रम, कठोर अभ्यास, सातत्य, प्रामाणिकपणा, चिकाटी आणि अनेक अडचणींवर मात करण्याची हिंमत होती. तीच हिंमत तुमच्यातही आहे. तुमच्याही डोळ्यांत सर्वोच्च पदांची स्वप्नं असू शकतात…आणि ती पूर्ण होऊ शकतात,” जर स्लम भागातील एक भूषण गवई सरन्यायाधीश होऊ शकतो, तर तुम्ही का मोठ्या पदावर जाऊ शकत नाही. सर्वच मुली सरन्यायाधीश होणार नाहीत, पण तुम्ही जिद्दीने अभ्यास केला तर खूप मोठ्या पदावर जाऊ शकता, याचा मला विश्वास आहे, अशा शब्दांत सरन्यायाधीशांच्या (Mamta Bal Sadan) मातोश्रींनी अनाथ मुलींच्या मनात आशेचा किरण जागवला.
पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (Dr. Sindhutai Sapkal) यांच्या ममता बाल सदन (बालगृह) (Mamta Bal Sadan) कुंभारवळण या संस्थेत आयोजित “माय लेकींचा हृदयस्पर्शी संवाद” कार्यक्रमात “आपले सुपुत्र भारताचे सरन्यायाधीश आहेत, त्यांना घडविण्यात आपला मोठा वाटा आहे. सरन्यायाधीशांची आई म्हणून आपली काय भावना आहे?” या मुलींच्या प्रश्नाला उत्तर देताना ‘त्या’ मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष दिपक गायकवाड, ममता सपकाळ, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव सोनल पाटील, आनंदीकाकी जगताप, अधिक्षिका स्मिता पानसरे, विनय सपकाळ, सार्थक सेवा संघचे अनिल कुडिया उपस्थित होते.
मुलींनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मनमोकळे पणाने उत्तर दिले. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, 1971 दरम्यान भारत बांगलादेश युद्ध सुरू होते. आम्ही फ्रेजरपुरा भागात राहायचो, तेंव्हा सैनिकांसाठी सेन्डॉप म्हणून पिठलं – भाकरी भोजनाची व्यवस्था आम्ही केली होती. मला भाकरी बनवायला भूषणची मदत झाली. मी भांडी घासायची, आणि भूषण भांडी धुवायचा. मी स्वैपाक करायचे, भूषण वाढणं करायचा. तिन्ही मुलांमध्ये दोघे भावंड लहान तर भूषण सर्वात मोठा मुलगा. लहानपणी गरजूंना मदत करण्याची आवड त्याच्यामध्ये निर्माण झाली, त्याला वेदनांची किंमत कळते. अशा जबाबदारीमुळे भूषण लहान वयातच परिपक्व झाला. त्याला सामाजिक भान आले.
आज मी देशासाठी भूषणला अर्पण केले आहे, तो न्याय दानाचे पवित्र कार्य अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत असल्याचे बघून माझं मन भरून येत. हे सांगत त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. नेता होण्यापेक्षा तुम्ही एक आदर्श माता, आई होण्याचा प्रयत्न करा, आज मी माईंच्या संस्थेला भेट देऊन धन्य झाले, माईंनी अनाथ मुलांना संस्कार दिले आहेत, ही संस्था म्हणजे पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ (Dr. Sindhutai Sapkal) यांची मायेची सावली, ज्यात अनाथ मुलींनी आपले स्वप्नं रुजवली आहेत. (Dr. Kamaltai Gavai) कमलताईंनी या मुलींशी अगदी आईसारखा हळुवार संवाद साधत त्यांचं मन जाणून घेतलं. पण केवळ मायेपुरताच हा संवाद मर्यादित नव्हता तो प्रेरणादायीही ठरला.
या संवादाने अनेक मुली भावनाविवश झाल्या. त्यांनी आपल्या मनातील इच्छा, भीती आणि स्वप्नं कमलताईंशी शेअर केली. त्या प्रत्येक शब्दात एक आस होती, कुणीतरी आपलं ऐकावं, समजावं, आणि हातात हात देऊन म्हणावं, “तू एकटी नाहीस…” डॉ. कमलताई गवई (Dr. Kamaltai Gavai) यांची ही भेट केवळ एक औपचारिक दौरा नव्हता, ती मायेची आणि प्रेरणेची ओल घेऊन आलेली आईच होती, जिने मुलींच्या डोळ्यांत आत्मविश्वासाचे अश्रू दिले. संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित पाहुणे यांच्यासाठीही हा क्षण अविस्मरणीय ठरला. या भेटीदरम्यान डॉ. कमलताईंनी माईंच्या लेकींशी अत्यंत हृदयस्पर्शी संवाद साधत त्यांचे मनोबल वाढवले. संस्थेतील मुलींशी संवाद साधताना त्यांच्या डोळ्यात आपुलकी आणि प्रेम ओसंडून वाहत होते. मुलींनीही आपले अनुभव आणि स्वप्ने उघड्या मनाने मांडले, त्याला कमलताईंनी आईच्या काळजातून समर्पक प्रतिसाद दिला.
आजच्या या भेटीमुळे माईंच्या लेकींच्या स्वप्नांना नवे पंख लाभले. मायेची भाषा शब्दांची मोहताज नसते. ती नजरेतून, स्पर्शातून, आणि हृदयातून व्यक्त होते. अशाच एका हृदयस्पर्शी क्षणाला आज ममता बाल सदन साक्षीदार ठरले. आज तुमच्या एका मिठीत एका हास्यात माईंच अस्तित्व पुन्हा जाणवलं…आई कधीच जात नाही… ती दुसऱ्या रूपात परत येते. आज आम्हाला कमलताईंमध्ये आम्हाला आमच्या माई पुन्हा एकदा भेटल्या, अशी भावना ममता सपकाळ यांनी व्यक्त केली. समाजातील वंचित निराधार निराश्रीत लाभार्थी पर्यंत पोहचून त्यांना शासकीय योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण शिबिराच्या माध्यमातून वेळोवेळी कार्यरत राहील, असा विश्वास सचिव सोनल पाटील यांनी व्यक्त केला.
संस्थेतर्फे डॉ. कमलताई गवई (Dr. Kamaltai Gavai) आणि विधी सेवा प्राधिकरणच्या सोनल पाटील यांचा तिरंगा ध्वज, सन्मानचिन्ह, तुळशीचे रोप भेट देऊन स्वागत केले. चिमुकल्या मुलींनी स्वागत गीत आणि ऐतिहासिक पोवाडा सादर करून सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाचे संचलन मुकेश चौधरी आणि सारिका कुंजीर यांनी केले.
अनाथ मुलांना मिळणार आधार कार्ड
समाजातील अनाथ मुलांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना त्यांच्याकडे आधार कार्ड उपलब्ध नसतात किंवा ते आधार कार्ड काढण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो याबाबत पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत ज्या अनाथ मुलांकडे आधार कार्ड नाही अशा मुलांना आधार कार्ड मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या साथी कार्यक्रम अंतर्गत (Mamta Bal Sadan) ममता बाल सदन संस्थेत विधी सेवा प्राधिकरण तर्फे आधार कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन केले होते.
या (Mamta Bal Sadan) शिबिराचे उद्घाटन माझी लेडी गवर्नर डॉक्टर गवई (Dr. Kamaltai Gavai) यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात प्राथमिक स्वरूपात 15 अनाथ मुलांची आधार नोंदणी करण्यात आली आहे. विधी सेवा प्राधिकरण शिबिराच्या माध्यमातून ही अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे नजिकच्या काळात अनाथ मुलांना देखील आधार कार्ड सोप्पे होईल.