पातूर पत्रकार संघटनेचा तीव्र निषेध
पातूर (Vitthal Mahalle) : दैनिक अजिंक्य भारतचे क्राईम रिपोर्टर तथा ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल आत्माराम महल्ले यांच्यावर 19 मार्च रोजी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला खदान पोलीस ठाणे हद्दीतील एस.टी. वर्कशॉपजवळ घडला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, शरीराच्या इतर भागांनाही गंभीर मार बसला आहे.
पोलिस अधीक्षकांकडे कठोर कारवाईची मागणी
या (Vitthal Mahalle) भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पातूर तालुका पत्रकार संघटनेने एकत्र येत पातूर पोलीस ठाण्यात निवेदन दिले. पोलिस अधीक्षक, अकोला यांना ठाणेदारांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या या निवेदनात हल्लेखोरांना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पत्रकार महल्ले यांनी हल्ल्यानंतर तातडीने खदान पोलिसांना फोन करून मदतीची मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी तब्बल अर्धा तास उशिरा घटनास्थळी पोहोचले, तोपर्यंत हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांच्या या निष्काळजीपणामुळे पत्रकार संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
पत्रकार विठ्ठल महल्ले (Vitthal Mahalle) हे निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि सामाजिक अन्यायाविरोधात अनेक सत्य घटना उघडकीस आणल्या आहेत. त्यांच्या निर्भीड पत्रकारितेमुळेच हा हल्ला घडवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे या हल्ल्याची सखोल चौकशी करून कटाचा पर्दाफाश करावा, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून केली जात आहे. यावेळी पत्रकार प्रदीप काळपांडे उमेश देशमुख सतीश सरोदे मोहन जोशी निखिल इंगळे राहुल देशमुख भावेश गिरोळकर रामेश्वर वाडी पंजाबराव इंगळे दुलेखान नाजीमुद्दीन शेख तवकीर अहमद नातिक अहमद किरण कुमार निमकंडे सय्यद साजिद संगीता इंगळे अब्दुल खुद्दुस शेख श्रीकृष्ण शेगोकार प्रमोद कढोणे स्वप्निल सुरवाडे सुनील गाडगे सचिन मुर्तडकर आधी पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते.
पत्रकारांवरील (Vitthal Mahalle) हल्ल्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई केली नाही, तर संपूर्ण पत्रकार संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पत्रकार संघटनांच्या प्रमुख मागण्या:
- हल्लेखोरांना तत्काळ अटक करून “पत्रकार संरक्षण कायदा 2017” आणि भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कठोर कारवाई करावी.
- पोलिसांच्या विलंबित प्रतिसादाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
- अकोला जिल्ह्यातील (Vitthal Mahalle) पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना तातडीने राबवाव्यात.
- पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी कायदेशीर संरक्षण देण्यात यावे.
- वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यात सखोल चौकशी करून कठोर उपाययोजना केल्या जाव्यात.
