चंद्रपूर (Municipal water supply) : शहरातील बालाजी वार्ड आणि बालाजी मंदिर परिसरात परिसरात महानगर पालिकेमार्फत टिल्लू पंप जप्तीची मोहीम राबविण्यात आली असून यात १५ ग्राहकांचे टिल्लू पंप जप्त करून नळ कपात करण्यात आली आहे.
मनपातर्फे शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक (मीटर) लावण्यात आले असुन मीटरचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. मात्र काही जागी मीटरला लावलेला पाईप काढुन पाणी भरत असल्याचे तसेच काही नागरिक टिल्लू पंपचा वापर करत असल्याचे आढळुन आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सर्व नळ जोडणींवर मीटर लावण्यात आले असल्याने पाण्याचा जेवढा वापर होईल तेवढेच देयक येत असुन अनावश्यक खर्च व अनावश्यक पाण्याच्या वापरावर नियंत्रण आले आहे.
मात्र काही नागरिक नळाचे देयक कमी करण्याच्या दृष्टीने मीटरला लागुन असलेला पाईप काढतात ज्यामुळे पाण्याचा वापर करतांना मीटर बंद असते व बिल अतिशय कमी येते,शिवाय टिल्लु पंप द्वारे मोठ्या प्रमाणात पाणी एकाच कनेक्शनवर ओढले जाऊन इतर नळधारकांना अतिशय कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतो.
त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम लक्षात घेता मनपातर्फे कारवाई सुरु असुन यापुढे अश्या प्रकारे पाणी भरतांना आढळल्यास त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याचे महानगर पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.